केडगाव – पारंपरिक पिकांना मिळत असलेला कमी बाजारभाव, तसेच मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दौंड तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिके न घेता आधुनिक शेतीचा मूलमंत्र घेत हळद पिकाकडे वळालेला दिसत आहे.
तालुक्यातील विविध भागात शेतीत हळद पीक, तर काही ठिकाणी हळदीचे दुबार पीक घेतले आहे. बाजारपेठेत हळद पिकाला मोठी मागणी आहे. भारतीय शेतकरी आपली शेतीतील जुन्या पध्दतीची पिके घेण्याचा कल सोडत नाहीत, त्यामुळे बाजारभाव ढासळून सर्वांचीच आर्थिक हानी होते, यामुळे शेतकऱ्यांनी मसाल्याच्या पिकापैकी हळदीचे उत्पादन घेतले आहे.
येथील काही जणांनी ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या समोर आधुनिक शेतीचा मंत्र ठेवला आहे. एका रोपट्याला एक ते दीड किलो हळद निघत आहे. मागील वर्षी त्यांनी या पिकाची लागवड केली आहे; परंतु उत्पादन कमी निघण्याचा त्यांना अंदाज आल्याने याच पिकाचा खोडवा ठेवला आहे.
उत्पादन आणखी वाढावे म्हणून, भुईमूग हे अंतरपीक घेण्यात येत आहे. हळद पिकाला बाजारपेठेत प्रतीक्विंटल 65 ते 70 हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. चालू वर्षी दोन्ही पिकांचे व्यवस्थापन, मशागत आदी कामे योग्यवेळी झाल्याने उत्पादन चांगले निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत आहे.
शेतकरी नेहमीच कांदा, काकडी, टोमॅटो, बटाटा, गवार, भाजीपाला आदी पिके घेत असतात.
या पिकांमधून म्हणावे तसे अर्थार्जन होत नाही, त्यामुळे शेतकरी नेहमीच अर्थिक फायदा मिळवून देणारी पिके घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु सगळेच शेतकरी सरसकट पिके घेत असल्यामुळे आर्थिक आवकेवर नेहमीच पाणी फिरते. याचा विचार करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा उपयोग करण्याची गरज आहे, यामुळे चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.