मुंबई – केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
राज्यात आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केले. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले होते.
दिल्लीत आठ दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन केले. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथे किसान कॉंग्रेस प्रदेशचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी वाडा-भिवंडी मार्गावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला. या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. त्यामुळे या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
तसेच किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. याशिवाय पालघरमध्ये कॉंग्रेस, कष्टकरी संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि माकपासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सोलापुरातील संत तुकाराम चौकात जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी रास्तारोको केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आडम यांच्यासह माकपच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले होते. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच झोपून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आडाम यांनी पोलिसांकडून आंदोलकांची मुस्काटदाबी सुरू असल्याचा आरोप केला.
कॉंग्रेसचीही आक्रमक भूमिका
कॉंग्रेसने आज सकाळापासूनच नागपुरात आंदोलन करून संपूर्ण वातावरण ढवळून काढले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाली होते. शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात आक्रमक भूमिका घेत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारचे पोस्टर जाळले. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अकोल्यातही शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत धडक दिलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू केल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.