सांगली (प्रतिनिधी) – प्रसिद्ध मराठी गझलकार इलाही जमादार यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सांगलीच्या दुधगाव या जन्मगावी वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उतुंग गझलकार सुरेश भट यांच्यानंतर इलाही जामदार यांचे नाव मराठी गझल कवी म्हणून घेतले जाते.
मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये 1 मार्च 1946 मध्ये इलाही जमादार यांचा जन्म झाला. मात्र त्यांची कर्मभूमी ही पुणे राहिली. वयाच्या 21व्या वर्षानंतर म्हणजे 1964नंतर इलाही जामदार यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला.
त्यानंतर त्यांच्या दर्जेदार काव्य लेखनामुळे त्यांना आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून ओळख मिळाली. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाही जमादार यांचे कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. नवोदित कवींसाठी इलाही जामदार यांनी “गझल क्लिनिक’ ही कार्यशाळा सुरू केली होती.
आकाशवाणीवरील “युवावाणी’ या कार्यक्रमात त्यांचे काव्यवाचन, त्याचबरोबर मराठी सुगम संगीत, स्वरचित्र यासारख्या कार्यक्रमांतून इलाही जमादार यांच्या संगीतबद्ध रचनांचे सातत्याने प्रसारण होत असे. दूरदर्शनवरच्या गाजलेल्या “आरोही’ या कार्यक्रमात इलाही यांनी स्वरबद्ध केलेली स्वरचित हिंदी गीते प्रसारित झाली आहेत. तसेच आखरी इन्तजार, सनक या काही टेलिफिल्म्सकरिता गीतलेखन केले.
त्याचबरोबर “एहसास अपने अपने’, “स्वामी समर्थ’, “पुलिस भी एक इन्सान है’, “चलो मछिंदर गोरख आयो’ या हिंदी मालिकांसाठी गीतलेखन केले. तसेच मर्मबंध, सप्तरंग, नसते उद्योग, गणेश पुराण, राजा शिवछत्रपति या मराठी मालिकांसाठीही इलाही जामदार यांनी गीतलेखन केले आहे.
इलाही जामदार यांनी “जखमा अशा सुगंधी’ व “महफिल-ए-इलाही’ या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रसिध्द होते. तर त्यांचे अनुराग, अनुष्का, अभिसारिका गुफगू, मुक्तक हे काव्य-गझल संग्रह आहेत.
सुरेशभट्टांच्या नंतरचे प्रसिध्द गझलकार..
इलाही जमादार यांनी अनेक गीत लेखन, काव्य लेखन आणि गझल यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्रात आणि अनेक ठिकाणी इलाही जमादार यांचे जाहीर कार्यक्रम होत असत. मराठीतील प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्यानंतर इलाही जमादार यांचे नाव आवर्जून घेतले जाते.