बारामती, {प्रमोद ठोंबरे} – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार कुटुंबीयातील कलह ठळकपणे दिसू लागला आहे. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर अजित पवार यांनी भाजपाशी घरोबा केला. त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय हे शरद पवार यांच्या पाठिशी ठाम राहिले आहे.
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर तोफ डागल्यानंतर या कलहाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. यावर संपूर्ण राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे. बारामतीच्या आखाड्यात राजकारणाला कुटुंबाची जोड मिळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक सध्या तरी भावनिकतेच्या वळणावर येऊन ठेपली आहे.
राज्यात एकसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. ४० आमदारांचा लवाजमा घेऊन ते सत्तेच्या सारीपाटावर आरूढ झाले. उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांची प्रतिमा काही अंशी पक्षफुटीबाबत डागाळली होती. मात्र, त्यानंतर ते यातून सावरण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, त्यांना शरद पवार, श्रीनिवास पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी मात दिली.
राज्य शासनाचा नमो महारोजगार मेळावा, बारामतीकरांचे पत्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोजनाचे निमंत्रण, आदी मुद्यांभोवती गेल्या महिन्यात वातावरण केंद्रीत झाले होते. त्यात शरद पवार यांचीच सरशी झाली होती.
मुख्यमंत्र्यांना भोजन निमंत्रण पत्रिकेत मी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत, असा उल्लेख करीत त्यांचे बारामतीतील योगदानाचे महत्व अधोरेखित केले होते. त्यानंतर महारोजगार मेळाव्यात शरद पवार यांना प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिंदे सरकारचा मोठा गाजावाजा केलेला हा मेळावा शरद पवार यांच्या वलयात झोकाळला गेला होता.
कुटुंबीयांचे मोठे पाठबळ
पवार कुटुंबीयातील सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची फौज आज मतदारसंघात सक्रिय झाली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ, जय पवार हे चौघे एका बाजूला आहेत.
यातच कुटुंबाकडून टीकेची झोड उठविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अजित पवार हे एकाकी पडले आहेत. अजित पवार यांनी भरसभेत एकाकीपणाची कबुली दिली होती. तसेच भावनिक होऊ नका, असे आवाहन केले. मात्र, मतदारसंघात अजित पवार यांच्या आवाहनाचा फारसा परिणाम झाला नाही.
कुटुंबातील राजकारण वेगळ्या वळणावर
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीयात दुफळीची बीजे पहिल्यादांच रोवली आहे. जिव्हाळा, आपुलकी, स्नेह वृद्धीगंत असलेले पवार कुटुंबात हा पहिलाच प्रसंग उभा ठाकला आहे. त्याला शरद पवार यांच्यासह सर्वजण धीराने लढा देत आहेत. तसेच सर्व कुटुंब जनतेत जाऊन संवाद साधत आहेत. हे विशेष आहे.
काटेवाडी येथील कार्यक्रमात श्रीनिवास पवार यांनी तोफ डागल्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचा धूर पसरला. यावर अजित पवार समर्थकाकडून युगेंद्र पवार यांना घेराव घालत जाब विचारला. श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. श्रीनिवास पवार यांचा घाव अजित पवार गटाला चांगलाच जिव्हारी लागला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या दोन महिन्यात संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारांशी संवाद, गाठीभेटी, पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा आदीतून त्यांनी मोट बांधली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर संघटन कमकुवत झाले होते.
त्यातून सावरून खासदार सुळे यांनी भोर, पुरंदर, मुळशी, इंदापूर, दौंड, बारामती, वेल्हे तालुक्यांत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच अजित पवार गटाकडे कसलेले मल्ल असल्याने त्यांनी संघटन मजबूतीकडे लक्ष दिले आहे.