बेल्हे,(वार्ताहर) – सुलतानपूर (ता. जुन्नर)च्या शेतकर्याच्या मुलीने वनरक्षकपदाला गवसणी घातली असून तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुलतानपूर येथील शेतकरी संदीप गोपाळा आतकरी यांची कन्या समृद्धी संदीप आतकरी हिची रत्नागिरी जिल्हा वनरक्षकपदी निवड झाली आहे.
या भरतीसाठी झालेल्या परीक्षेत समृद्धीने ई.डब्ल्यू. एस. प्रवर्गातून परीक्षा दिली होती. तिला 200 पैकी 172 गुण मिळाले. तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा सुलतानपूर, माध्यमिक शिक्षण पंडीत नेहरू विद्यालय निमगाव सावा येथे झाले.
सध्या ती दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे कला शाखेत द्वितीय वर्षांमध्ये शिक्षण घेत आहे. समृद्धीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तिने दोन वर्ष अभ्यास करून घवघवीत यश संपादन करून वनरक्षक ही पदवी मिळवली आहे.
तिच्या या यशाबद्दल श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, पांडुरंग पवार यांनी अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या.