बारामती (प्रतिनिधी)- किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा, भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. सर्व वीज उपकेंद्रांना व शाखा कार्यालयांना सुरक्षा रक्षक नेमावेत व (स्व) रिंकू बनसोडे यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,
अधिकारी, अभियंता, संघटना संयुक्त कृती समिती’ने प्रशासनाला निवेदन दिले आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्यास चालढकल केल्यास नाईलाजास्तव रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.
मोरगाव (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. २४) सकाळी अभिजीत पोटे नावाच्या माथेफिरूने वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे-थिटे यांची किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन कोयत्याने वार करीत निर्दयीपणे हत्या केली. पोलीसांनी आरोपीला तातडीने अटक केली तरी त्याला लवकर व कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविणे गरजेचे आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणच्या कामाचे स्वरुप पाहता वीज कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होतात. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी संघटनेच्या संयुक्त कृती समितीची मागणी आहे.
यावेळी संयुक्त कृती समितीने मागण्यांचे निवेदन महावितरणचे मुख्य अभिंयता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांना देण्यात आले. . निवेदनावर संघटनेचे सुरेश देवकर, गणेश जाधव, कल्याण धुमाळ, चंद्रकांत दामोदरे, नितीन वाघ, श्रीधर कांबळे, रमेश चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.