सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलेले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे भाजप-सेनेमध्ये प्रवेश होत व होणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर आतापर्यंत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे पक्षबदलाचे परिणाम राष्ट्रवादीला जास्त प्रमाणात सोसावा लागणार असून अनेक मतदारसंघांमध्ये पक्ष एकटा पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत कालपर्यंत नेतृत्वगुण असूनदेखील अडगळीत पडलेल्या नेत्यांना महत्त्व येणार आहे. भाजप-शिवसेनेमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून प्रवेश होत असल्याने युतीतील या पक्षांच्या मूळच्या, प्रमुख निष्ठावंत नेत्यांवर अडगळीत पडण्याची वेळ आली आहे.
एकूणच दोन्हीकडील परिस्थिती पाहता अडगळीत जात असलेल्या अन् अडगळीतून बाहेर पडलेल्या नेत्यांनी तिसरी आघाडी उभारण्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असून त्यांना पक्षश्रेष्ठींकडूनही पाठबळ मिळेल, असे संकेत आहेत.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खा. उदयनराजे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी असलेल्या मैत्रीचा दाखला देत राष्ट्रवादीकडून जिरवाजिरवीचे राजकारण झाल्याची टीका केली होती. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीची हवा जवळपास निघून गेल्याचे चित्र आहे.
शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे भाजपमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेले दीपक पवार आणि अमित कदम यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात तिसरी आघाडी आकाराला येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे पाठबळ असले तरी भाजपमधील नाराज उमेदवाराला राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
फलटण विधानसभा मतदारसंघातून ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप किंवा शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनादेखील ऊत आला आहे.
ना. रामराजेंनी अशा चर्चेचा अजून तरी इन्कार केलेला नाही. फलटणचा राजेगट नजीकच्या काळात भाजप अथवा शिवसेनेत गेला तर त्या ठिकाणीदेखील सर्वपक्षीय तिसरी आघाडी उभारण्याचे संकेत आहेत. त्या आघाडीला पक्षीय रंग नसेल; पण रिमोट पुन्हा बारामतीकरांच्या हातात असेल, अशा हालचाली सुरू आहेत. वास्तविक रामराजे राजकारणात येण्यापूर्वी फलटण मतदारसंघात खा. शरद पवार यांना मानणारे अनेक नेते होते आणि अजूनही आहेत. रामराजेंचा राष्ट्रवादीच्या माध्यमातून मतदारसंघात तब्बल 25 वर्ष “होल्ड’ राहिला. त्यामुळे पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते अडगळीत गेले.
त्यांच्यापुढे रामराजेंचे नेतृत्व स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. आता अडगळीत पडलेल्या नेत्यांना “अच्छे दिन’ येणार असल्याचे जाणवू लागले आहे. कारण, रामराजेंचा भाजप अथवा शिवेसेनेत प्रवेश झाला तरच राष्ट्रवादीत नवे नेतृत्व उभारू राहू शकते. विशेषत: फलटण मतदारसंघाचे राजकारण कायम गटांवरच चालत आले आहे. त्यापैकी अनेक गटांचे नेतृत्व आता हयात नाही तर काही गटांचे नेतृत्व आर्थिक अडचणीत आल्याने राजकारणापासून दूर गेले आहे. परिणामी सद्य स्थितीत फलटणमध्ये रामराजे विरुद्ध खा. रणजितिसिंह नाईक निंबाळकर असाच संघर्ष आहे.
त्यात राजेगटाने कायम सरशी साधली असली तरी लोकसभा निवडणुकीत खा.रणजितसिंह हे भाजपकडून फलटणचा समावेश असलेल्या माढा मतदारसंघातून निवडून आले. आता त्याच भाजपमध्ये अथवा मित्रपक्षात रामराजे यांनी प्रवेश केला तर रणजितसिंह यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. परिणामी राष्ट्रवादीचे जुने नेते व उर्वरित अनेक पक्षातील नाराज नेते एकत्र येऊन तिसरी आघाडी उभारण्याच्या तयारीत आहेत.
माण-खटावमध्ये अगोदरच गोरे बंधूंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधली आहे. शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर आ. जयकुमार गोरे यांचाही भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे माण-खटावमध्ये गोरे बंधू पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकलेले दिसू शकतील. अशा वेळी “आमचं ठरलंय’ची टीम काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, या टीममध्ये नेत्यांची संख्या अधिक आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत या सर्व नेत्यांचे एकमत होऊन एकच उमेदवार तिसऱ्या आघाडीतून उभा केला तर तिरंगी लढत रंगतदार होऊ शकते.
दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना संधी
जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे पक्षांतर होणार असल्याने अनेक मतदारसंघांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीला नेतृत्वच शिल्लक राहणार नसल्याची स्थिती आहे. या स्थितीत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना पक्षावरील निष्ठा सिद्ध करण्याची आणि मतदारसंघाचे प्रमुख नेतेपद मिळण्याची योग्य संधी असणार आहे. राजकारणात कुठल्याच पक्षाची अथवा नेत्यांची अबाधित सत्ता राहिलेली नाही. आज ना उद्या भाजप-शिवसेनेलादेखील जेव्हा सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल, तेव्हा सद्य स्थितीत निष्ठा सिद्ध करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.