मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंह यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी खोटा आरोप केल्याचे देशमुख यांनी म्हटलं आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.