शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याला सितारा गोल्ड या मिरची वाणाची रोपे म्हणून दुसरी रोपे दिल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील तनिष्क हायटेक नरसरी पिंपळे जगताप यांचा परवाना 21 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पंचायत समिती कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी दिली आहे.
तळेगांव ढमढेरे ता. शिरूर येथील शेतकरी दत्तात्रय रमेश तोडकर यांनी तनिष्क हायटेक नरसरी मधून मे.Monsanto Holding pvt ld,Telngana उत्पादित बियांणापासून मे.तनिष्क हायटेक नरसरी यांनी तयार केलेले मिरची सितारा गोल्ड या वाणांची रोपे खरेदी केली होती. परंतु सदर रोपे सितारा गोल्ड या वाणांची नसून दुसऱ्या वाणाची असल्याने नुकसान झालेची तक्रार पंचायत समिती कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांच्या कडे केली होती.
त्या अनुषंगाने तालुका तक्रार निवारण समितीने सदर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली असता सदर पिकाचे गुणधर्म कंपनी ने सांगितल्या प्रमाणे नसल्याचे समिती ला दिसून आले. तक्रारी च्या अनुषंगाने निलेश बुधवंत यांनी सदर नरसरी ची (दि. 07) तपासणी केली असता, साठा व भाव फलक न लिहीणे, विक्री परवाना मध्ये समाविष्ट नसलेल्या कंपनीच्या बियाणे पासून रोपे तयार करून विक्री करणे, बियाणे खरेदी साठा नोंदवही अद्यावत नसणे, बियाणे खरेदी व रोपांचा विक्री अहवाल न पाठविणे इ. त्रुटी आढळून आलेल्या असल्याने पुढील कारवाई साठी प्रस्ताव परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे बाळासाहेब पलघडमल यांच्या कडे पाठविण्यात आला होता.
(दि.27) रोजी परवाना अधिकारी यांच्या कडे संबंधित विक्रेत्याची सुनावणी घेण्यात आली, तपासणी मध्ये आढळून आलेल्या मुद्दाचे अधारे व विक्रेत्यांनी दिलेल्या लेखी खुलासा विचारात घेता सदर विक्रेत्याचा रोपे विक्री परवाना दि.28 पासून पुढील 21 दिवस निलंबित करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे आज रोजी शिल्लक असलेल्या रोपांना परवाना अधिकारी यांच्या आदेशानुसार निलेश बुधवंत कृषी अधिकारी यांनी विक्री बंद आदेश दिलेला आहे.