पुसेगाव (प्रतिनिधी) – ज्यांना खडतर परिश्रम करायचे आहेत त्यांनीच स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्याचा विचार करावा. प्रशासकीय सेवेत प्रत्येक पदावर प्रत्येकाला प्रभावक्षेत्र मिळते. शासकीय सेवेत काम करायला स्काय इज द लिमीट असते. या माध्यमातून समाज घडविता आणि बदलता येतो. स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे बदललेल्या अभ्यासक्रमाची आणि परिक्षापध्दतीची माहिती घेऊन स्पर्धा परिक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जा. असे आवाहन पुणे विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
पुसेगाव पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते. मुलाखतकार अजित चव्हाण यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना चंद्रकांत दळवी यांनी हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोर त्यांचा जीवनपट उलगडला.
स्पर्धा परिक्षा आणि बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले, आठ महिने काम करुन २६ राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करुन आपल्या राज्यसेवा परिक्षांचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. पूर्व परिक्षेतील सिव्हिल सर्विसेस ॲप्टीट्यूड टेस्ट हा पेपर मेरिटमधून काढून क्वॉलिफायरमध्ये समाविष्ट केला आहे. मुख्य परिक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असायची ती आता वर्णनात्मक होणार आहे. भाषा विषय पूर्वी मेरिटसाठी होते ते आता क्वॉलिफायर करण्यात आले आहेत. वैकल्पिक विषयांनाही परवानगी देण्यात आली आहे. निबंधांचा २५० गुणांचा एक पेपर सुरु करण्यात आला आहे. हे बदल केल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससीतही यशस्वी होणार आहेत.
सोशल मिडिया अनअव्हायडेबल इव्हिल ….
सोशल मिडियाचा वापर मर्यादित आणि कामापुरताच करा. फक्त अभ्यासासाठीच मोबाईल वापरा. परिक्षांचा अभ्यास करताना मोबाईल बंदच ठेवा. सोशल मिडियाचा अतिरेक टाळा. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. ते अनअव्हायडेबल इव्हिल्स आहेत असेही दळवी यांनी सांगितले.
दळवी पुढे म्हणाले, पाचवी ते दहावीची इतिहास, भूगोल, सायन्स ही पुस्तके जपून ठेवा. अवांतर वाचन सुरु ठेवा. ११ वी १२ वीत असताना स्पर्धा परिक्षांचा विचार करा. पदवीच्या पहिल्या वर्षापासून अधिक गांभिर्याने विचार करा. शेवटच्या वर्षी फॉर्म भरुन लगेच पहिली परिक्षा द्या. पुढील दोन वर्षे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना स्पर्धा परिक्षांचा मन लावून अभ्यास करा. आता आठ हजार पदांसाठी परिक्षा होणार आहेत. त्यासाठी आधाशासारखे वाचन लिखाण आणि उजळणी करा. दिवसातून किमान आठ ते दहा तास अभ्यास करुन स्वतःच्या नोट्स काढा. लिखाणाची सवय वाढवा. वर्ग एक, दोन अधिकारी,पोलीस पाटील ते अगदी कोतवाल पदासाठीही स्पर्धा परिक्षा द्याव्या लागत आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करुन अभ्यास करा. काय, कसे आणि किती लिहायचे ते आत्मसाद करा. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करा. भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याने इंग्रजीचे दडपण घेऊ नका.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दळवींची मार्गदर्शक उत्तरे …..
पुसेगाव पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चंद्रकांत दळवींच्या प्रकट मुलाखतीला हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, आणि पालकांनी स्पर्धा परिक्षांसंबंधी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना दळवींनी समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान केले. दळवींच्या मुलाखतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने स्पर्धा परिक्षांची कवाडे खुली झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा परिक्षा अभ्यासाचा बाऊ करु नका. नॉलेज सामर्थ्य आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोण ठेवून मुलाखतीला सामोरे जा. मुलाखत व्यक्तिमत्त्व चाचणी असते. त्यात बोलणे प्रभावी हवे. संभाषण कौशल्य चांगले असले पाहिजे. नजरेला नजर भिडवून उत्तरे द्या. विद्यार्थ्यांनी अष्टावधानी असले पाहिजे.
‘गर्भधारणा चालू ठेवायची की नाही, हा अधिकार ‘त्या’ महिलेलाच! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवून काम करताना समाजासाठी हितकारक योजना राबवता येतात. लोकांच्या समस्या सोडविणारा प्रशासनातील सिंघम अधिकारी बनता येते. स्पर्धा परिक्षांसाठी खडतर परिश्रम लागते. अपयश आलेच तर दुसरे पर्याय तयार ठेवा. खचून जावू नका असे आवाहन करतानाच स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे जीवनात यशस्वी होताताच असेही शेवटी त्यांनी सांगितले.