नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वाटणाऱ्या द्वेषातून कॉंग्रेस सशस्त्र दलांचा अपमान करत आहे, असे भाजपने म्हटले. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्जिकल स्ट्राईक्समुळे पाकिस्तानला प्रचंड वेदना झाल्या. आपल्याकडेही काही जणांना तशाच वेदना झाल्याचे दिसते.
सर्जिकल स्ट्राईक्सनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजप आणि सशस्त्र दलांच्या पाठिशी उभी राहल्याचे निकालातून स्पष्ट झाले. तर, सर्जिकल स्ट्राईक्सविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. कॉंग्रेसच्या यात्रेतील भारत जोडो नावापुरतेच आहे. त्या पक्षाचे नेते खरे तर भारत तोडण्याचे काम करत आहेत, असे टीकास्त्र भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सोडले.
दरम्यान, राजकीय वादंग निर्माण करणाऱ्या दिग्विजय यांच्या वक्तव्यापासून कॉंग्रेसने स्वत:ला दूर ठेवणे पसंत केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या ट्विटमधून ते सूचित झाले. दिग्विजय यांनी मांडलेली भूमिका कॉंग्रेसची नसून व्यक्तिगत आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनेही 2014 या वर्षाच्या आधी सर्जिकल स्ट्राईक केला होता. राष्ट्रहितासाठीच्या सर्व लष्करी मोहिमांना कॉंग्रेसचा पाठिंबाच आहे आणि असेल, असे रमेश यांनी म्हटले.