पुणे – राज्यात गळीत हंगाम सुरू झाला की सर्वाधिक चर्चेत येणारे ठिकाण म्हणजे साखर संकुल. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या शेतकरी संघटना आणि शेतकरी यांच्या आंदोलनामुळे हा भाग गजबजून जातो; पण यंदा मात्र उलट चित्र दिसत आहे. गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अद्याप एकही आंदोलन येथे झालेले नाही. सगळे कामकाज कसे शांतपणे सुरू आहे.
शिवाजीनगर येथील साखर संकुल असून राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर अंकुश ठेवण्याचे केंद्र असून गाळप हंगाम सुरू झाला की राज्यातील शेतकरी दरवर्षी या ठिकाणी येऊन आंदोलन करतात अधिकाऱ्यांना घेराव घालतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या होत असलेल्या या आंदोलनामुळे या परिसरातील रस्ते पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. असेच चित्र गेले अनेक वर्ष गाळप हंगामात पाहायला मिळत होते. यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहे.
दुष्काळाचा परिणाम
शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन खर्चात मागील वर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीच्या महापुरामुळे ऊसाचे उत्पादन घटले. मागील वर्षीच्या 107 लाख टनांवरून ते थेट 55 लाख टनांपर्यंत घसरले आहे. त्यातच गाळप हंगाम सुद्धा उशिराने सुरू झाला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना सुद्धा शांत बसल्या आहेत. शेतकऱ्यांकडे उसच नसल्यामुळे कारखाने सुद्धा शांत आहेत. एफआरपी वाढविण्यास केंद्राने नकार दिल्यानंतर ही कुठल्याही संघटनेने त्याचा विरोध केलेला नाही.