बारामती (प्रतिनिधी)- भाजप सरकारने शेतकर्यांचा शेतीमाल दूध, साखर स्वस्त केले तर दुसर्या बाजूला इंधनाच्या किंमती वाढविल्या आहेत. शेतकरी पिकवितात ते स्वस्त आणि दुसरे पिकवितात ते महाग करण्याचे केंद्राने धाेरण राबविले आहे. शेतकर्यांना वरच्या खिशात पैसे टाकून दुसर्या खिशातून दुप्पट पैसे काढून घेतले जातात. ही एक प्रकारची पाकीटमारी आहे. पाकीटमारीची पध्दत बंद करण्यासाठी निर्णय घेणारा बाजुला करण्याची गरज असल्याची टीका पवार यांनी केंद्र सरकारवर केली.
कन्हेरी (ता. बारामती) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, अमित शहा नावाचे गृहस्थ आहेत. ते दहा वर्षात शरद पवार यांनी काय केले, याचा हिशोब मागतात. गेल्या दहा वर्षात सत्ता कोणाची आहे, मंत्री कोण आहे. मी सत्तेत नव्हतो, पण हिशोब मात्र मला मागतात, असा टोला पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लगावला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, काहीजण मला दहा वर्षात काय केले, अशी विचारणा करतात. पण त्या दहा वर्षात तुम्ही पण सत्तेत होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्याच निधीतून आपण विकासकामे केली आहेत. विकास निधीचे पुस्तक विरोधकांना ‘पॅकींग’ करुन पाठविणार आहे. त्यामध्ये सत्य तेच लिहीले आहे. त्यांनी ते वाचले नाही, तरी चाळावे.
आपला पक्ष एक होता. सर्वांनी मिळून काम केले. दिल्लीत मी, इथ तुम्ही काम करायचे असं ठरलेच होते ना, वयाचा नात्याचा, पदाचा सन्मान केला, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला. झाल गेले गंगेला मिळाले, चिन्ह का गेले, कसं गेले, यात मी पडत नाही, असे देखील सुळे म्हणाल्या.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, विरोधकांकडे नेते, तर आमच्याकडे निष्ठावंत आहेत. ही निवडणूक शरद पवार विरुध्द भाजप आहे. यावेळी आमदार संजय जगताप, युगेंद्र पवार आदींची भाषणे झाली. यावेळी राजेंद्र पवार, सुनंदा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, आप्पासाहेब जगदाळे, अॅड. संदीप गुजर, एस. एन. जगताप, पाैर्णिमा तावरे, सत्यव्रत काळे आदी उपस्थित होते.
राज्यघटनेबाबत जागरूक राहण्याची गरज
पवार म्हणाले, मोदी, फडवणीस यांच्यासह अन्य नेते आमच्या विरोधात घटना बदलण्याचा खोटा प्रचार सुरु असल्याचे सांगतात. मात्र, त्यांचेच मंत्री घटना बदलणार असल्याचे सांगतात. घटना बदलण्याचा विचार गंभीर आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार महत्वपूर्ण आहे. त्यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.