ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांना “पुण्यभूषण’ पुरस्कार
पुणे – “भारताची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध उत्पादनाच्या आयातीपेक्षा निर्यातीला अधिक प्राधान्य देण्याची गरज निर्माण झालेली आहे. कल्पक तरुण ही आपली ताकद असून त्यांच्यातील उद्योगशिलता व उद्यमशीलतेला चालना दिल्यास आत्मनिर्भर भारत बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे,’ असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुण्यभूषण फाउंडेशन व पुणेकरांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते 32 वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजूमदार, उद्योगपती प्रतापराव पवार, माजी क्रिकेटपट्टू चंदू बोर्ड, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, गजेंद्र पवार आदी उपस्थित होते. भारतात लवकर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, ट्रकच्या लॉंचिंग होणार आहे.
पुणे ते बंगळुरू, पुणे ते औरंगाबाद या रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यांत हाती घेण्यात येणार आहेत. पुण्याला जोडणाऱ्या रिंगरोडची कामेही करण्यात येणार आहेत, असे गडकरी म्हणाले. कार्यक्रमात पुण्यातील “जायबंदी’ संस्थेतील धरमवीर सिंग, सुरेशकुमार कर्की, के. नागी रेड्डी, बलवीर सिंग, बहादुर गुरुंग या पाच स्वातंत्र्य सैनिकांचाही गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन योगेश देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सतीश देसाई यांनी केले. आभार काका धर्मावत यांनी मानले.
पुण्यात प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली
आता पूर्वीचे जुने पुणे राहिले नाही. पुण्यात प्रदूषण, वाहतूक कोंडी, गर्दी वाढली आहे. पुण्याचे वेगळे वैशिष्ट असल्याने अनेकदा पुण्याने देशाला दिशा दिली आहे. पुण्यात आयटी, ऑटोमोबाइल उद्योग वाढला आहे. आता पुण्याने मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून जगाच्या नकाशावर स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे.