बासमती, कापूस, सोयाबीनचे दर घसरले
करोना व्हायरसमुळे निर्यात थंडावली : जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहण्याची आशा
पुणे – करोनाचा परिणाम भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीवरही होऊ लागला आहे. त्यामुळे कृषी उत्पादनाचे दर कमी झाले आहेत. ते आणखी कमी होण्याची भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. जर ही भीती खरी ठरली तर भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे मूल्य पुरेशा प्रमाणात मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कापूस, बासमती राइस आणि सोयाबीन या तीन उत्पादनांना अनेक देशातून चांगली मागणी आहे. मात्र निर्यातीसाठी पाठवलेला माल बंदरावर पडून असल्यामुळे गेल्या एक महिन्यामध्ये बासमती कापूस आणि सोयाबीनच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. कापसाच्या दरात 7 टक्के बासमतीच्या दरात 10 टक्के तर सोयाबीनच्या दरात 5 टक्के घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
निर्यातदारांनी सांगितले की, आम्हाला ज्या काळात निर्यात वाढण्याची शक्यता वाटत होती त्याच काळात यापारावर परिणाम झाला आहे. 20 मार्च पासून इराणमध्ये मोठा सण साजरा होतो. या सणासाठी आम्ही इराणला बासमती आणि सोयाबीनची निर्यात करीत असतो. मात्र इराणमधील बंदरावर आणि भारतातील बंदरावर कामकाजावर परिणाम झाला असल्यामुळे निर्यात होण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
त्यामुळे इराणला जाणारा बासमती तांदूळ थांबला आहे. ईराण भारतीय बासमतीचा सर्वात मोठा आयातदार आहे. निर्यातीमध्ये बासमतीचा वाटा तब्बल 30 टक्के आहे. याबाबत बोलताना जगदंबा अग्रिको या निर्यात करणाऱ्या कंपनीचे संचालक सतीश गोयल यांनी सांगितले की, निर्यातीसाठी योग्य वेळीच व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे आमच्या कारभारावर परिणाम झाला आहे. बंदरावर निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला 60 हजार टन बासमती पडून आहे.