आरिफ शेख
चीनच्या अध्यक्षपदी शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा होणारी निवड आणि चीनच्या संसदेनं तयार केलेला सीमा सुरक्षा कायदा यामुळे जगावर काय परिणाम होतील, याची चिंता सुरू झाली होती. जगापुढे काय वाढून ठेवले आहे, त्यापेक्षा चीनमधील या घडामोडी भारतासाठी जास्त चिंताजनक आहेत.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी मराठीत म्हण आहे. चीनला ती तंतोतंत लागू पडते. डोकलाम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आदी भागात तो कायम घुसखोऱ्या करीत असतो. नव्या सीमा सुरक्षा कायद्यानं तर चीनच्या लष्कराला जादा अधिकार मिळाले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी गेल्या वर्षी ज्यो बायडेन यांची निवड झाल्यानंतर आता प्रथमच जिनपिंग व बायडेन यांची चर्चा झाली.
अमेरिकेसारख्या महाशक्तीला तैवानच्या मुद्द्यावरून थेट ठणकावणारा ड्रॅगन भारताला ताकास तूर लागू देत नाही. भारतासोबतच्या सीमावादाच्या दरम्यान चीननं शेजारील भूतानच्या सीमेवरही घुसखोरी केली आहे. अगोदर नेपाळमधील भूभाग घशात घातला. त्यानंतर अरुणाचल प्रदेशाच्या आत एक गाव वसविलं.
भारत सरकारनं जरी त्याचा इन्कार केला असला, तरी गलवान खोऱ्यातील अनुभव लक्षात घेतला, तर चीन काहीही करू शकतो. आता चीननं भूतानच्या सीमेजवळील सुमारे 25 हजार एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. इतकंच नाही तर चीननं इथं 40 गावंही वसवली आहेत. सॅटेलाइट फोटोंद्वारे हा गौप्यस्फोट झाला आहे.
या छायाचित्रांमधून चिनी गावं स्पष्टपणे दिसू शकतात. या जमिनीवरून भूतान आणि चीनमध्ये जुना वाद आहे. ही जमीन आपलीच असल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. गेल्या वर्षभरात गावं वसविण्यात आली.
चीननं गेल्या एका वर्षात (2020-21) या वादग्रस्त जमिनीच्या मोठ्या भागावर मनमानीपणे बांधकाम सुरू केलं असलं आहे. एकीकडं वाटाघाटीचा आव आणायचा आणि दुसरीकडं पाठीत खंजीर खुपसायचा, ही ड्रॅगनची कूटनीती भारताला नवीन नाही. चीन आणि भूतानमध्ये अलीकडंच सीमा करारावर स्वाक्षरी होत असतानाच ही बाब समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
डोकलामजवळील भूतान आणि चीन यांच्यातील वादग्रस्त जमिनीवर 2020-21 दरम्यान बांधकामं झाली. चीननं सुमारे शंभर किलोमीटर चौरस क्षेत्रात अनेक नवीन गावं वसवली आहेत. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. डोकलामचा गेल्या चार वर्षांपूर्वीचा 72 दिवसांतील संघर्ष विस्मरणात गेलेला नाही. डोकलाम या परिसरात भारत उंचावरून हल्ला करून, चीनला नमवू शकतो. त्यामुळे आता तिथं मुद्दाम गावं वसविण्याची खेळी चीननं केली आहे.
हा भाग डोकलामला लागून आहे ही चिंतेची बाब आहे, की हा भाग भारतीय भूभाग डोकलामच्या अगदी जवळ आहे, जिथं चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले होते. हा भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. भारत आणि भूतानचं सैन्य परस्पर संमतीनं या भागात लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. अशा परिस्थितीत चीनचा हा डाव दोन्ही देशांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. चीन पुढील वर्षापासून नवीन सीमा कायदे लागू करणार आहे.
सात दशकांहून अधिक काळानंतर चीननं प्रथमच आपल्या सीमा कायद्यात बदल केला आहे. या अंतर्गत चीन भारतासह 14 देशांच्या भौगोलिक सीमांवर आपली गस्त वाढवू शकेल किंवा सीमेवर असलेल्या व्यापार चौक्या एकतर्फी बंद करू शकेल. ड्रॅगनची ही हालचाल अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा भारत आणि चीनमधील सीमा विवादाबाबत लष्करी आणि नागरी पातळीवर चर्चा सुरू आहे. लडाख, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात भारताचा चीनसोबत सीमावाद आहे.
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील वादाचं प्रमुख कारण काही भागात लष्करी गस्त हेदेखील आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन भारताच्या चिंतेवर म्हणाले, की आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की नवीन कायद्याचा विद्यमान करार किंवा करारांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही सीमा विकासावर काम करत राहू. चीननं आपल्या 14 पैकी 12 शेजाऱ्यांसोबत सीमा विवाद मिटवल्याचा दावा केला आहे. एकट्या भारत आणि भूतानमध्ये हा वाद मिटलेला नाही.