डॉ. ऋतू सारस्वत
नोकरदार महिलांच्या तुलनेत गृहिणींची संख्या आजही अधिक आहे. पण कुटुंबाचा गाडा रेटूनही तिचा मान ठेवला जात नाही. शेवटी ती आत्महत्येचा मार्ग निवडते. गृहिणींना वेळीच मान दिला नाही तर हे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.
काही वर्षांपूर्वी निलकांती पाटेकर यांचा “आत्मविश्वास’ नावाचा मराठी चित्रपट आला होता. या चित्रपटात पाटेकरांची मध्यवर्ती भूमिका असून ती मुलगा, सून, नातवंड यांच्या चक्रव्यूहात अडकलेली असते. घरातील प्रत्येक काम करत असतानाही तिचा सातत्याने अपमान केला जातो. शेवटी तिच्यात आत्मविश्वास जागा केला जातो आणि ती कुटुंबाची सूत्रे आपल्या हाती घेते. चित्रपटाचे कथानक हे गृहिणीचे प्रतिनिधित्व करते.
एखाद्या गोष्टीत स्वार्थभाव असेल तरच संवेदनशील मुद्द्यांना राजकीय पातळीवर
चर्चेला जोर येतो. अन्यथा गृहिणीसारख्या गंभीर, संवेदनशील विषयांकडे राजकीय मंडळींचे आणि धोरणकर्त्यांचे लक्ष असतेच असे नाही. सध्या भारतातील गृहिणी नैराश्याच्या
गर्तेत आहेत. त्यामुळेच त्यांचा आत्महत्येचा दर हा शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट आहे. तरीही याकडे कोणाचेच लक्ष नाही. नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरोच्या अहवालात “ऍक्सिडेंटल डेथ अँड सुसाइड रिपोर्ट-2020′ मध्ये यासंदर्भात काही धक्कादायक खुलासे आहेत.
गेल्या काही वर्षांत गृहिणींमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. “एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारतात एकूण आत्महत्येमागे शेतकऱ्यांचे प्रमाण 7 टक्के तर गृहिणींचे प्रमाण 14.6 टक्के आहे. अहवालात असेही म्हटले की, गेल्यावर्षी आत्महत्या करणाऱ्या लोकांत दुसऱ्या स्थानांवर महिलावर्ग आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी या कारणांमुळे आत्महत्येचे मार्ग निवडणाऱ्या शेतकऱ्यांचा नंबर हा सातवा आहे. ही स्थिती अनेक वर्षांपासून आहे.
तरीही राजकीय व्यासपीठावर केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरच विचार केला जात आहे. कारण महिलांच्या विशेषत: गृहिणींच्या आत्महत्येने कोणताही राजकीय लाभ मिळत नसल्याने या मुद्द्याकडे राजकीय पक्षांचा कानाडोळा होतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे देशाला मोठा धक्का बसत असला तरी ही संवेदनशील नजर महिलांकडे का पडत नाही, असा प्रश्न आहे. आत्महत्येत महिला शेतकऱ्यांचे प्रमाणदेखील लक्षणीय असून त्याची चर्चा होत नाही.
गेल्यावर्षी देशभरात 5579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यात 244 महिला शेतकरी आहेत. त्यांच्या आत्महत्येची देखील दखल घ्यायला हवी. विशेष म्हणजे भारतीय गृहिणींचा आत्महत्येचा दर हा जागतिक सरासरीच्या दुप्पटीपेक्षा अधिक आहे. विवाहानंतर महिलांचे जीवन सुरक्षित होते हा जगाने मांडलेला तर्क खोटा ठरवणारे हे आकडे आहेत.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये विवाहित लोकांचे त्याच वयोगटातील अविवाहित लोकांच्या तुलनेत आत्महत्येचे प्रमाण कमी आहे. साधारणपणे गृहिणींचा आत्महत्येचा दर अधिक असण्यामागे लैगिंक भेदभाव हे कारण सांगण्यात येत आहे. याशिवाय आणखी काही कारणे आहेत, की ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गृहिणींच्या जीवनावर परिणाम करणारे आहेत.
सप्टेंबर 2018 मध्ये मेडिकल मॅगझिन लॅन्सेटमध्ये 2016 च्या “जेंडर डिफ्रेन्शियल्स अँड स्टेट व्हेरिएशन्स इन सुसाइडस इन इंडिया : द ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’त म्हटले की,
जगभरातील महिलांच्या आत्महत्येचा थेट संबंध घरगुती हिंसाचाराशी आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, देशांत 15 ते 49 वयोगटांतील 29 टक्के विवाहित महिलांनी जोडीदाराकडून कौटुंबिक हिंसाचाराचा सामना केला आहे. या वयोगटातील गृहिणी सर्वाधिक आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट होते. आत्महत्या हे एक सामाजिक दबावाचा दुष्परिणाम आहे आणि सामाजिक जीवनात अशी स्थिती निर्माण होते की, एखादी व्यक्ती जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त होते. गृहिणींचे जीवन हे मानसिक तणावापासून दूर आणि चार भिंतीच्या आत आरामदायी असल्याचे गृहित धरले जाते.
नोकरदार महिला घर आणि ऑफिस यांच्यात संतुलन बसवण्याचा खटाटोप करत असताना गृहिणीच्या तुलनेत अधिक संघर्ष आणि तणावाशी झुंजत असतात. त्यामुळे त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जाते; परंतु गृहिणी म्हणून वावरणाऱ्या महिलांचे अस्तित्व नाकारले जाते. यानुसार गृहिणींच्या भावनांना कोणतेच स्थान दिले जात नाही आणि त्यांची नेहमीच उपेक्षा केली जाते. याउलट त्यांनी मांडलेल्या अडचणी या मानसिक विकाराचा भाग असल्याचे समजून अवहेलना केली जाते.
दुर्दैवाने गृहिणींच्या मनःस्थितीचा विचार आरोग्य पातळीवरही केला जात नाही आणि सामाजिक पातळीवरही नाही. गृहिणी घरात असल्याने तिचा अपेक्षेप्रमाणे मान सन्मान केला जात नाही. तिला प्रत्येकवेळी कमी लेखण्यात येते आणि परिणामी मानसिक ताण बळावत जातो. एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला देखील सतत कमी लेखले गेले तर त्याच्या अंगी निराशा वाढणे स्वाभाविक आहे. हीच स्थिती भारतीय गृहिणींची असून तिच्या श्रमाला कोणतीही प्रतिष्ठा दिली जात नाही.
सरकारकडून नाही अन् समाजाकडूनही मान्यता मिळत नाही. “ऑक्सफेम’च्या रिपोर्टनुसार भारतातील एकूण गृहिणींना आणि मुलींना एखाद्या नोकरदार महिलेप्रमाणे गृहित धरले तर त्यांचे वार्षिक मूल्य किमान 19 लाख कोटी रुपये एवढे असेल. त्यांच्या कामाला महत्त्व न देणे हा एकप्रकारे त्यांचा अपमान करण्यासारखेच आहे. आत्महत्येवर केलेल्या विविध अभ्यासात 80 टक्के प्रकरणात पीडित महिला या नैराश्यात अडकलेल्या असल्याचे आढळून आले आहे.
प्रत्यक्षात कमी वयात विवाह आणि मातृत्वाचे ओझे लादणे हे महिलांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळे तारुण्यावस्थेत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती तुलनेने कमी राहते. स्त्रीची भूमिका ही नेहमीच द्विधामनःस्थितीत अडकलेली असते आणि हे वास्तव नाकारू शकत नाही. विवाहित महिलांना काही कटू अनुभवाचा देखील सामना करावा लागतो. विवाहानंतर तिचे पालक, कुटुंब आणि अन्य सदस्य हे मुलीप्रती उदासीन होतात.
कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयात सामील करून घेणे दूरच, त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी अन्य लोकांवर अवलंबून राहावे लागते आणि ही बाब त्यांच्या मनात निराशा वाढवणारी आहे. दोन व्यक्तींची तुलना देखील निराशा वाढवणारी आहे. प्रत्येक गृहिणींची शिक्षित महिला किंवा नोकरदार महिलेशी तुलना केली जाते. त्यामुळे गृहिणींच्या कामाचे कौतुक करणे दूरच, उलट कमी समजले जाते.
सातत्याने होणारी उपेक्षा आणि एकाकीपणामुळे त्यांच्या मनात आपली कुटुंबाला गरज नसल्याची भावना विकसित होते. परिणामी हीच भावना त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. गृहिणींच्या सामाजिक भूमिकेची होणारी अवहेलना ही समाजाला धोकादायक दिशेने नेत आहे. याउलट ती कुटुंबाची चालक असते. तरीही ती कायम उपेक्षित राहात आली आहे.