सातारा – सातारा तालुक्यातील पावसाची अनियमितता आणि करोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतीपंपाची वीज बिले माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव व सदस्यांनी केली.
याबाबत त्यांनी महावितरणचे श्री. वाघ यांना निवेदन दिले. यावेळी गट विकास अधिकारी किरण सायमोते, माजी सभापती मिलिंद कदम, राहुल शिंदे, दयानंद उघडे, रामदास साळुंखे, विद्या देवरे,बेबीताई जाधव, सौ. कुंभार आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सातारा तालुक्यामध्ये 21 हजार 337 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले. यावर्षी फक्त 60 टक्के पर्जन्यमान झाले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कमी पर्जन्यमान त्यातच करोनाचे संकट यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने शेतीपंपाची भरमसाठ वीज बिले शेतकऱ्यांना दिली आहेत.
या संकटाच्या काळात शेती पंपाची वीज बिले माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्यांनी केली.