नगर -करोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु योग्य काळजी घेतल्यास आपण यापासून आपला बचाव करु शकतो. त्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा स्विकार केला पाहिजे. स्वच्छतेला आपली सवय बनविले पाहिजे. सुखकर्ता प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धनही केले जाते. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत असतात. सामाजिक भावनेतून प्रतिष्ठान कार्य करत आहे, असे प्रतिपादन सुखकर्ता प्रतिष्ठानेच अध्यक्ष डॉ.गणेश बडे यांनी केले.
शेवगांव तालुक्यातील येरंडगांवत सुखकर्ता प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण करुन सॅनिटयझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच संतोष धस, फुंदे महाराज, आर.के.बडे, रामदास शेवाळे, भगिनथ बडे, जगन्नाथ बडे, रामनाथ बडे आदि उपस्थित होते.
यावेळी बडे म्हणाले की, निसर्गाचे चक्रच बिघडले असल्याने हवामानात अनेक समस्या निर्माण होत आहे. कुठे पुर, तर कुठे दुष्काळ भेडसावत आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकता, आपणाबरोबरच आपल्या भावीपिढीचा विचार करुन प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे. असे ही त्यांनी सांगितले.