नवी दिल्ली – गुजरातमधील आपच्या 5 नवनिर्वाचित आमदारांपैकी काही जण पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपला मिळणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाचे काय होणार, असा प्रश्न पुढे आला आहे. मात्र, आमदार सोडून गेले तरी आपला तो दर्जा मिळणे निश्चित असल्याचे एका तज्ञाने स्पष्ट केले आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत आप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. केवळ 5 जागांवर त्या पक्षाला समाधान मानावे लागले. पण, त्या पक्षाच्या वाट्याला समाधानकारक 13 टक्के मते आली. ती कामगिरी आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणार आहे. आता गुजरातमध्ये आप प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जाईल. दिल्ली, पंजाब आणि गोवा या तीन राज्यांत आपला याआधीच प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. किमान चार राज्यांत प्रादेशिक दर्जा मिळवणारा पक्ष राष्ट्रीय म्हणून ओळखला जातो.
गुजरात निवडणुकीमुळे राष्ट्रीय पक्ष बनण्यास आप सज्ज झाला असतानाच त्या पक्षाचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही आमदार सोडून गेल्यास आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे अवघड होईल, असे तर्क-वितर्कही सुरू झाले. त्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या माजी अधिकाऱ्याने आपचा राष्ट्रीय दर्जा आता निश्चित असल्याचे नमूद केले.
कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लगेच राज्यांना GST क्लेम देऊ – अर्थमंत्री सीतारामन
राजकीय पक्षांची निवडणुकांमधील कामगिरी विचारात घेतली जाते. निवडणुकांनंतरच्या घडामोडींमुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा विषय प्रभावित होणार नाही, असे त्या माजी अधिकाऱ्याने सूचित केले.