कोल्हापूर – महात्मा गांधी यांचा खुन करण्याचा एकुण सहा वेळा प्रयत्न झाला होता, महात्मा गांधीची हत्या केली तरी गांधी विचारांचा दिवसेंदिवस जगभर प्रभाव वाढतच आहे, गांधीजींच्यामुळे देशाची फाळणी झाली व पाकिस्तानला ५५कोटी रुपये देणे भाग पडले, अशी धादांत खोटी, निराधार माहिती जाणिवपूर्वक प्रसृत केली जाते व धर्म भेद, जातीभेद पसरवून सनातनी लोक आजही गांधींविचार दडपण्याचा प्रयत्न करतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी केले. स्वरूप प्रकाशन पुणे या संस्थेच्या वतीने डॉ.प्रा. जे. बी. शिंदे यांच्या मराठी कवितेमधील गांधी दर्शन व प्राचार्य डॉ. अजित यादव लिखित मन व मनाची शक्ती मिळविण्याचे मार्ग या दोन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाले, त्यावेळी अध्यक्ष पदावरून प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील बोलत होते.
ज्येष्ठ संशोधक, समिक्षक व लेखक डॉ. आनंद पाटील प्रमुख पाहुणे होते. प्रा.सुजय पाटील, व प्रा. डॉ.अनिल घस्ते हे प्रमुख वक्ते म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुनीलकुमार सरनाईक व प्रा. डॉ. नागेश नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. आनंद पाटील म्हणाले, काही जणांनी चुकीचा इतिहास मांडला आहे, बालवाडी पासूनच आपली शिक्षणपद्धती कुचकामी ठरत आहे, ‘भ’ भटजीतला शिकवले, ते जर ‘भ’ भाकरीतला शिकवले असते तर भाकरी मिळवण्यासाठी जे कष्ट पडतात त्याची लहानपणापासून प्रत्येकाला जाणिव झाली असती.
स्वागत व प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी केले, तर सुत्रसंचलन व आभार विशाखा जितकर यांनी केले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अशोक चौगुले, विजय शिंदे, चंद्रसेन जाधव, स्वरूप शिंदे, निर्मिती शिंदे, उज्वला गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.