सांगली – राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्या निवडणुकांत राज्यातील सत्तारूढ भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने मिळून वर्चस्व राखले. मात्र, संख्याबळात सत्ताधाऱ्यांच्या जवळपास पोहचून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने टफ फाईट दिली.
दरम्यान, या निवडणुकीत तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांना मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली आहे. तालुक्यात भाजपला केवळ 12 ग्रामपंचायतीत विजय मिळवता आला आहे. खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा युवा नेते रोहित पाटील यांच्या गटाने मोठा जोरदार धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.