मुंबई – दिवाळी फिकी जाईल असे वाटत होते. प्रत्यक्षात रस्ते आणि दुकानांत झुंबड आहे. दिव्यांचा उत्सव झगमगतो आहे. राम दिग्विजयी होऊन अयोध्येत आले तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता उत्सव साजरा करूया!
दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असे वाटले होते. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची वगैरे पर्वा न करता लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुधा कोरोना चिरडून मरेल असा विनोद त्यावर काही लोकांनी केला. कोरोना आहे तसाच आहे. लोकांचे चिरडणे सुरू आहे.
या मुद्यावरून सामना रोखठोक लेखातून संजय राऊत यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कोरोना महामारी आणि अर्णब प्रकरणावरुनही भाजपावर निशाणा साधत ‘महागाई, मंदी, कोरोना आहेच! तरीही दिवाळीचे तेज मोठे!!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा रोखठोक लेख ?
दिवाळी फिकी जाईल असे वाटत होते. प्रत्यक्षात रस्ते आणि दुकानांत झुंबड आहे. दिव्यांचा उत्सव झगमगतो आहे. राम दिग्विजयी होऊन अयोध्येत आले तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता उत्सव साजरा करूया!
दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असे वाटले होते. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची वगैरे पर्वा न करता लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुधा कोरोना चिरडून मरेल असा विनोद त्यावर काही लोकांनी केला. कोरोना आहे तसाच आहे. लोकांचे चिरडणे सुरू आहे. दिवाळी सण साजरा करावा असे सगळय़ांनाच वाटते. ही परंपरा आहे. आजची दिवाळी व दीडशे वर्षांपूर्वीची दिवाळी यात फरक आहे. गोविंद नारायण माडगावकर यांचे मुंबईचे वर्णन करणारे पुस्तक 1861 साली प्रसिद्ध झाले. त्यात मुंबईतील दिवाळी सणाचे वर्णन केले आहे ते असे.
”दीपवाळी ह्या सणाचा मुंबईत उत्साह होतो, तसा पृथ्वीवर कोठेच होत नसेल. हे मंडण सतत पांच दिवसपर्यंत असते आणि हा पाहावयास लोक देशोदेशांतून येत असतात. अनेक तऱहांची चित्रे, आरसे, हांडय़ा व झुंबर लावून पेढय़ा व दिवाणखाने इतके शृंगारितात की, त्यापुढे श्रीमंतांचा आरसेमहाल कांहीच नाही. किल्ल्यांत, बाजारात व सर्व मुंबईभर रस्तोरस्ती व गल्लोगल्लीत हांडय़ा व गलासें पेटलेली असून जिकडेतिकडे गाडय़ांची गर्दी असत्ये. प्रत्येक पेढीत अरास होत्ये तिचे वर्णन केले तितके थोडेच. ज्या दिवशी पेढीपूजन होते व नव्या चोपडय़ा होतात त्यादिवशी तर कोटांत आणि मार्पिटांत गाडय़ांची आणि मणुष्यांची इतकी गर्दी होते की, नदीच्या लोटासारिखी गाडय़ांची हार लागलेली असते.
या दिवसात गुजराथी, घोडेवाले एकत्र जमून एक तऱहेवाईक पोशाख करून पायांत चाळ व कमरेत घागऱया बांधून हातात दोन दोन काठय़ा घेऊन गृहस्थाच्या घरी जाऊन नाचत असतात, व गाणी हाणतात. ह्यांस रुपया आठ आणे पोस्त द्यावे पडते. काही मोठा सणवार आला ह्मणजे शिपाई, चाकर वगैरे लोकांस आठ-चार आणे बक्षीस द्यावे पडतात, त्यास पोस्त म्हणतात. बलिप्रतिपदेचे दिवशी गवळी लोकांचा मोठा सण, हय़ा दिवशी म्हशींस व गाईंस शृंगारून पंचवाद्यांनिशी रस्तोरस्ती व इष्टमित्रांच्या घरोघर फिरवितात. मग त्यांस पंचारतीची ओवाळणी होत्ये. कोणी कोणी इंग्रजी बाजादेखील लावितात.”
अयोध्येत दिवाळी
प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही. चौदा वर्षे वनवास भोगून रावणावर विजय मिळवून राम अयोध्येत परत आल्याची आनंदवार्ता हनुमंताने भरताला सांगितली. त्यावेळी भरत म्हणतो, ”मनुष्य जिवंत असला तर त्याला शंभर वर्षांनी का होईना आनंद मिळतोच!” याचा अनुभव अनेकदा येतच असतो. एका अर्थाने भरताने जगाला आणि समाजाला संदेश दिला आहे की, ”दुःखे कोसळली तरी ती सहन करावीत. खचून जाऊन आत्महत्येचे टोक गाठू नये. कारण केव्हा ना केव्हा दुःख संपतेच. पहाट होते. आपण खचून जाऊन जीवनाचाच नाश केला तर सुखाचे दिवस कसे येऊ शकतील?” हे ‘रामायणा’चेच सार आहे. रामाला वनवास घडला. निशादराज मंथरेला आणि पैकयीला दोष देऊ लागला. त्यावेळी लक्ष्मण त्याला म्हणाला, ”बाबा रे, तिला का दोष देतोस? सुख किंवा दुःख देणारे दुसरे कोणी नसते. इतर कोणामुळे तरी आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. तसेच ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतूच आहे.” तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते!