Ethanol production : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (sugarcne Farmers) आणि साखर कारखानदारांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण बातमी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मितीस अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या परवानगीचे स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वागत केलं आहे. इथॉनॉलच्या निर्मितीवर बंदी घालणे हा चुकीचा निर्णय होता. जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जीवाश्म इंधनाला इथेनॉल हा पर्याय असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट सरकारने घातली आहे. ही अट 35 लाख टनापर्यंत वाढवावी अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. साखरेचे उत्पादन गरजेपुरते होणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.
सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते. मात्र, वाढता विरोध पाहता हा निर्णय मागे घेत पुन्हा एकदा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारने साखर उद्योगातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन , सबसिडी आणि व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले आहे. साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगाने यामध्ये गुंतवले आहेत. अशातच अचानक केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली होती. याचा मोठा फटका कारखानदारांना बसणार होता. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता होती.