बंगळुरू – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस.ईश्वरप्पा यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. अपक्ष म्हणून ते उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमध्ये भाजपचा विस्तार करण्याचे श्रेय माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यासह काही मोजक्या नेत्यांना दिले जाते. त्यामध्ये ईश्वरप्पा यांचाही समावेश आहे.
यावेळी मुलाला हावेरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यास ईश्वरप्पा उत्सुक होते. मात्र, भाजपने मुलाला तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. मुलाचा पत्ता कट होण्यासाठी त्यांनी येडियुरप्पा आणि त्यांच्या दोन मुलांना जबाबदार धरले. येडियुरप्पा यांचे एक पुत्र बी.वाय.विजयेंद्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
तर, दुसरे पुत्र बी.वाय.राघवेंद्र पक्षाचे शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्या पिता-पुत्रांच्या नाराजीपोटी ईश्वरप्पा यांनी स्वत:च शिवमोग्गामधून रिंगणात उडी घेण्याचे ठरवले आहे. ईश्वरप्पा यांचे बंड शमवण्यासाठी भाजपच्या गोटातून प्रयत्न करण्यात आले.
पण, ते प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. तसे असले तरी ईश्वरप्पा अखेरच्या क्षणी माघार घेतील अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. ती चर्चा गुरूवारी स्पष्ट शब्दांत फेटाळत ईश्वरप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इरादा जाहीर केला.