पिंपरी – पुण्यातील रिंगरोडच्या नुकसान भरपाईसाठी बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाधितांवर अन्याय नको, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. शेतकऱ्यांनी शिरुरुचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन याप्रकरणी सहकार्य करण्याचे साकडे घातले. या दोन्ही आजी-माजी खासदारांनी यात लक्ष घातले आहे. आता शिरुरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे देखील या प्रकरणात उतरले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देत, रिंगरोडसाठी भूसंपादनाच्या नुकसान भरपाईची किंमत ठरविण्याच्या पद्धतीची माहिती देण्याची मागणी केली आहे.
भूसंपादनाकरिता मिळणारा मोबदला कमी असल्याच्या बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून ही माहिती मागवत असल्याचे या निवेदनात डॉ. कोल्हे यांनी नमूद केले आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील नियोजित रिंगरोडचे भूसंपादन हे नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या अल्प रकमेमुळे चर्चेत आले आहे. सुुरुवातीला जमीनीच्या पाच पट मोबदला देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ही ऑफर फायद्याची वाटली. मात्र, त्यानंतर भूसंपादनाकरिता मिळणाऱ्या रकमेचे धनादेश पाहता, अपेक्षित रक्कम दिली जात नसल्याच्या बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. मात्र. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून, जिल्हा प्रशासनावर दबाव टाकू शकणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे बाधित शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे हा प्रश्न मांडण्याचा आग्रह मावळचे विद्यमान खासदार बारणे व शिरुरचे माजी खासदार आढळराव या दोघांकडे केला आहे. आजी-माजी खासदारांनी या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे देखील आता या प्रकरणात लक्ष घालताना दिसत आहेत.
खासदार कोल्हे यांनी मागितलेली माहिती
भूसंपादनासाठी जमिनीची किंमत कशी ठरविली जाते ?
दर निश्चितीसाठी कोणती व किती वर्षातील खरेदी व्यवहार विचारात घेतले जातात.
त्यासाठी खरेदी खताचे निकष काय असतात?