नगर – नगर शहरात सोमवारपासून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मदन आढाव यांनी महापालिका आयुक्तांकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सोपवला. ‘नेते गेले चुलीत’ म्हणत आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा निषेध केला आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठ्यांना शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचेही सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विविध संघटना व संस्थांनी आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. मराठा क्रांती मोर्चाने नगर शहरात सुरू केलेले साखळी उपोषण रविवारी थांबवले. मात्र, कालपासून आमरण उपोषण सुरू केले. नगर मनपाचे स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी आंदोलकांच्यावतीने तहसीलदार संजय शिंदे व तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मदन आढाव यांनी मनपा आयुक्तांकडे राजीनामा सादर केला.
मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. कारण की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण सरकार देत नाही. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे. मराठा समाजाच्या तरुण मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. या राजकारणाचा वीट आला आहे. सर्व राजकीय पुढाऱ्यांनी मराठा समाजाला वेड्यात काढले आहे. जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी कॅंडल मार्च, साखळी उपोषण, आंदोलन करण्यात येत आहेत.