सांगोला -देशभक्त किसन वीर यांनी स्वातंत्र चळवळीत आणि स्वातंत्रोत्तर काळात देशासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव सतत आहे. त्यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले; परंतु मदन भोसले यांनी या पुरस्कारासाठी माझी आवर्जून निवड केली. हा पुरस्कार आगळावेगळा आहे. तो नम्रतेने स्वीकारून जनतेला अर्पण करत आहे, असे उद्गार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी काढले.
भुईंज, ता. वाई येथील किसन वीर साखर कारखान्याच्यावतीने देशभक्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार गणपतराव देशमुख यांना देण्यात आला. करोनामुळे सांगोला, जि. सोलापूर येथे शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पुरस्कार वितरण झाले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशमुख म्हणाले, स्वातंत्र चळवळीत किसन वीर यांनी येरवड्याचा तुरुंग फोडल्याने त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने बक्षीस ठेवले होते; पण वीर अखेरपर्यंत त्यांच्या हाती लागले नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी सहकार, शिक्षण, राजकारण या क्षेत्रात योगदान दिले.
मदन भोसले म्हणाले, गणपतराव देशमुख व प्रतापराव भोसले यांनी पुलोद सरकारमध्ये एकत्र काम केले होते. आयुष्यभर विरोधी पक्षात राहूनही देशमुख यांनी आपला दरारा निर्माण केला. त्यांना हा पुरस्कार देण्याची प्रतापराव भोसले आणि दिवंगत विनायकदादा पाटील यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झाली आहे. यावेळी सौ. रतनताई देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
शेतकरी सूतगिरणीचे अध्यक्ष नानासाहेब लिंगाडे, सांगोला पंचायत समितीच्या सभापती राणी कोलवले, जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता दांडोरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष पी. डी. जाधव, बाजार समितीचे सभापती गिरीश गंगाधडे, बाळासाहेब काटकर, नाना भोसेकर, साहेबराव ढेकळे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब बाबर, बाबासाहेब कारंडे, किसन वीरचे संचालक चंद्रकांत इंगवले, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, नवनाथ केंजळे, चंद्रसेन शिंदे, विजय चव्हाण, प्रकाश पवार, अनिल जोशी, रमेश डुबल उपस्थित होते. एन. एम. काळोखे यांनी मानपत्राचे वाचन केले. राहुल तांबोळी यांनी मानपत्राचे लेखन केले. ऍड. प्रतापसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक, नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब काटकर यांनी आभार मानले.