शिर्सूफळ येथे टॅंकर उलटल्याने झाला अपघात
बारामती – शिर्सूफळ (ता. बारामती) येथे ट्रॅक्टरला जोडलेला पाण्याचा टॅंकर उलटून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अक्षय बाळासाहेब भारती (वय 25, रा. शिर्सूफळ, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात विकास धनंजय भारती यांनी खबर दिली.
याबाबतची माहिती अशी की, शिर्सूफळमधून दत्तवाडी येथील आपल्या घरी अक्षय निघाला होता. त्याने ट्रॅक्टरला पाण्याचा रिकामा टॅंकर जोडला होता. धवडेवस्तीजवळ अरुंद रस्त्यामुळे अंदाज न आल्याने ट्रॅक्टरवरील त्याचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर उलटून तो त्याखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सुमारे 600 लोकवस्ती असलेल्या शिर्सूफळच्या दत्तवाडीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यानेच हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्याच्या मागणीसाठी 30 वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे;परंतु त्याला अद्याप यश आलेले नाही. तर आता बळी गेला असून आतातरी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला आहे.