नवी दिल्ली: करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर दिसून येत आहे. अनेक क्षेत्रांचे उत्पादन मंदावले असून देशाची अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर, कंपन्यांनी उत्पादन तसेच कर्मचाऱ्यांच्या वेळा याबाबत निर्णय घेताना कर्मचारी कपात करू नये, असे आवाहन भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आपल्या सदस्य कंपन्यांना गुरुवारी केले.
सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी यासंदर्भात सांगितले की, ‘सध्याचा काळ कठीण व आव्हानात्मक आहे. उद्योगजगताने सर्व प्रकारच्या कर्जांच्या फेडीवर सवलत देण्याची तसेच व्याजदरांत कपात करण्याची आणि त्याचवेळी बाजारात भांडवल तरलता वाढवण्याची विनंती केली आहे. करोनामुळे उद्योग संकटात सापडले असताना, आम्ही सर्व सदस्य उद्योगांना आवाहन केले आहे की, शक्यतो कुणाला कामावरून कमी करू नका. कर्मचाऱ्यांची तसेच छोट्या सेवा पुरवठादारांची काळजी घ्या.’
करोनामुळे जगभर मंदीचे वातावरण आहे. आयात व निर्यात तसेच चीनमधून येणाऱ्या सुट्या भागांवर आधारित उत्पादितांचे उद्योग धोक्यात आले आहेत. बाजारात वस्तूंची मागमीही रोडावली असून त्यामुळे कंपन्यांच्या आर्थिक नियोजनावर वाढता ताण आहे. अनेक कंपन्या करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कंपन्यांतून अनेक प्रकारची बंधने लागू करत आहेत. यातच व्यवसाय धोक्यात आल्यामुळे काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्गही अवलंबला आहे. या पार्श्वभूमीवर, किर्लोस्कर यांच्या वरील आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. करोना विषाणूच्या प्रसाराची भीती असल्यामुळे अनेक कंपन्यांनी संचालक मंडळांच्या बैठका व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याविषयी चाचपणी सुरू केली आहे.