संगमनेर -येणाऱ्या काळात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोना नियंत्रणासाठी संशयीतांची तपासणी वाढविण्यासह सर्वेक्षणावर भर द्यावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संगमनेर येथे केली.
संगमनेर नगरपरिषदेच्या सभागृहात करोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या तुलनेत संगमनेरमध्ये मृत्यूचा दर अधिक असून, ही चिंतेची बाब आहे. करोनामुळे रुग्णाचा मृत्यू होणे वेदनादायी आहे. करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
करोनाशी मुकाबला करण्याचा अनुभव नसतानाही गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, नर्सस, वॉर्ड बॉय, डॉक्टर, नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी, तालुका व जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.
कोणतीही अडचण, गरज भासल्यास माझ्याशी कोणीही आणि केव्हाही संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्वांच्या प्रयत्नाने आणि नागरिकांच्या सहकार्याने संगमनेर शहर व तालुका लवकरच कोरानामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.