पहिल्या टप्प्यातील 719 जागा रिक्तच : तीन टप्प्यांत उपलब्ध होणार होते मनुष्यबळ
पिंपरी – आयुक्तालयाची स्थापना करताना तीन टप्प्यांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. मात्र पहिल्या टप्प्यातील 61 अधिकाऱ्यांसह 719 पदे अद्यापही रिक्तच आहेत. कमी मनुष्यबळामुळे कामकाज करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच करोनामुळे अनेक पोलीस बाधित झाले असून अनेक पोलीस निवृत्त झाल्याने “कोणी अधिकारी देते का अधिकारी’ असे म्हणण्याची वेळ वरिष्ठांवर आली आहे.
पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली त्यावेळी तीन टप्प्यात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली होती. पहिल्या टप्प्यात तीन हजार 467 इतके मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार होते. आयुक्तालय सुरू होऊन दोन वर्षाचा कार्यकाल होत आला आहे. तरीदेखील अद्याप पहिल्या टप्प्यातीलही मनुष्यबळ पुरविण्यात आलेले नाही. केवळ दोन हजार 809 इतकेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयाकरिता बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर लॅब, अंगली मुद्रा तज्ज्ञ, श्वान पथक, समाजसेवा शाखा, परकीय नागरिक नोंदणी विभाग अत्यंत आवश्यक आहे. मात्र मनुष्यबळाच्या अभावी अद्यापही काही विभाग सुरू करता आलेले नाहीत. तसेच अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे पद रिक्त आहेत.
निवृत्त झालेले पोलीस अधिकारी
पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यापासून सहायक आयुक्त सतीश पाटील, गणपत माडगूळकर, चंद्रकांत अलस्टवार, श्रीकांत मोहिते, नीलिमा जाधव तर पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, भीमराव शिंगाडे, कल्याण पवार निवृत्त झाले आहेत. याशिवाय 19 उपनिरीक्षकही निवृत्त झाले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांच्या बदल्यात नवीन अधिकारी शासनाकडून अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.