मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात सभापती रामराजे निंबाळकर यांनी घोषणा केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या (मंगळवार 8 सप्टेंबर) ही निवडणूक होणार आहे. भाजपने उमेदवारी अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे.
भाजपने विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून दिग्गज नेते आणि विधान परिषद आमदार भाई ऊर्फ विजय गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर आमदारपदी नियुक्त झाले आहेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे.
भाजपकडून आमदार प्रसाद लाड आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नावाची चर्चा होती. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
उपसभापती पद एकमताने करावे, अशी आमचीदेखील भूमिका होती. आता हे अधिवेशन संपल्यानंतर लगेच अधिवेशन नाही. पुढच्या अधिवेशनातही निवडणूक घेता आली असती, पण सदस्यांचा मतदानाचा हक्क जाणीवपूर्वक डावलून अशाप्रकारे लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचंही मत आहे, आमचीदेखील मोठी संख्या आहे, आम्हीदेखील निवडणुका घेऊ शकतो. त्यामुळे आम्हीदेखील फॉर्म भरला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, कॉंग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.
दरम्यान, करोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेत या अधिवेशनात उपसभापती निवडणूक घेऊ नये, अशी मागणी भाजपने अधिवेशनापूर्वीच सरकारकडे केली होती. मात्र, आता निवडणूक जाहीर झाल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.