जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या आकडेवारीत टाकले मागे; मृत्यूदर पोचला चारशेजवळ
नव्या 869 बाधितांची रुग्णसंख्येत भर
नगर (प्रतिनिधी) – करोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येने औरंगाबाद शहर अलीकडे अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे मानले जात होते. मात्र, नगर जिल्ह्याने आज त्या गंभीर अवस्थेपलीकडचा पल्ला गाठला आहे. नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने आज तब्बल 26 हजारांचा टप्पा गाठला. या रुग्णसंख्येने औरंगाबादलाही मागे टाकले आहे. करोना विषाणूची नगरमधील ही दहशत सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवित आहे.
जिल्ह्यात आज 380 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 150 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.64 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 869 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3954 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 329, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 246 आणि अँटिजेन चाचणीत 294 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये मनपा 63, संगमनेर 49, राहता 3, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 38, श्रीरामपूर 10, कॅन्टोन्मेंट 7, नेवासे 5, श्रीगोंदा 43, पारनेर 8, अकोले 33, राहुरी 32, कोपरगाव 26, जामखेड 2, कर्जत 5, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 246 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली.
यामध्ये, मनपा 112, संगमनेर 20, राहाता 24, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट 4, नेवासे 6, श्रीगोंदा 2, पारनेर 15, अकोले 1, राहुरी 16, कोपरगाव 2, जामखेड 2 आणि कर्जत 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटिजेन चाचणीत आज 294 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 86, संगमनेर 23, राहाता 21, पाथर्डी 6, नगर ग्रामीण 16, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 2, श्रीगोंदा 19, पारनेर 18, अकोले 27, राहुरी 1, कोपरगाव 11, जामखेड 15 आणि कर्जत 32, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 380 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 98, संगमनेर 27, राहाता 34, पाथर्डी 8, नगर ग्रामीण 39, श्रीरामपूर 32, कॅन्टोन्मेंट 13, नेवासे 32, श्रीगोंदा 15, पारनेर 21, अकोले 10, राहुरी 13, शेवगाव 1, कोपरगाव 16, जामखेड 3, कर्जत 17 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
कुणी बेड देता का बेड?
नगरमध्ये उपचार घेणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या रोजच चिंताजनक स्थितीत वाढत आहे. नगरमधील करोनामुक्तीचे प्रमाण चांगले असले, तरी वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना आरोग्यसेवा पुरविणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेने हात टेकले आहेत. अत्यवस्थ रुग्णांनाही आता कोणत्याच खासगी रुग्णालयात बेड शिल्लक राहिलेले नाहीत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा बहुतेक वेळ आता बेड शिल्लक असलेले रुग्णालय शोधण्यातच खर्च होत आहे. त्यात त्रास असह्य झाल्यास नातेवाईकांच्या काळजात धस्स होत आहे.