मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने दंड थोपटले आहेत. पुढील काळात राज्यातील 10 महापालिकांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. दुसरीकडे भाजपकडे जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन कऱण्यात आलं आहे. नुकतीच केंद्रीमंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या नेत्यांना घेऊन ही जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे.
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनानेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यासोबत घेऊ, असा दावा राणे यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे मंत्री आहेत. मात्र मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. ते आमच्याकडे आलेत तर त्यांना घेऊ असंही राणे यांनी म्हटलं आहे.
यावेळी राणे यांनी मनसे-भाजप युतीवरही आपलं मत व्यक्त केलं. मनसे-भाजप युती झाली तर आनंदच आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीवाद वाढल्याच्या राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं राणे यांनी यावेळी टाळलं.