Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम शाकाहारी नसून मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाजपचे नेते जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जितेंद्र आव्हाडांना एक सल्ला दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून एकनाथ खडसे म्हणाले,” माझ्या वडीलकीच्या नात्याने जितेंद्र आव्हाड यांना सल्ला आहे की, वाद होईल असा कोणताही मुद्दा हातात घेऊ नका,” असे खडसे यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिरात बोलत होते.
शिबिरातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे, गावपातळीपर्यंत अध्यक्ष नेमला आहे का हे महत्वाचे आहे. संघटना मजबूत असेल तर पक्षाचे कार्यक्रम करणे सोपे होते. सभासद नोंदणी सक्रिय झाली की सदस्यांची संख्या वाढते. आंदोलन, मोर्चे हे स्वतः हून केले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी सेल्फ स्टार्टर असायला हवे. जे हल्ले आपल्यावर होत आहेत त्याला प्रतिउत्तर द्या. नेत्यांवर आरोप झाला की तूम्ही सुद्धा समोरच्यावर तुटून पडायला हवे. तुमच्या हातात व्हॉट्सअप, फेसबुक आहे त्यातून तुटून पडा.” असा सल्ला दिला.
पुढे एकनाथ खडसे महागाईवर बोलताना, सध्या महागाईवर कुणीच बोलतं नाही. चहा पे चर्चा होते तर मग दूध पर चर्चा क्यू नहीं. महंगाई पर चर्चा क्यों नहीं. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करा, आता पक्षासाठी काम करा. तरच संघटन मजबूत होईल आणि तुम्हाला पुढील काळात यश मिळेल.” असे म्हणाले.