मुंबई: पुढील वर्षी होत असलेल्या टोकयो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत 18 भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवली आहे. यामध्ये कुस्ती, तिरंदाजी, नेमबाजी, रिले व पुरुष गटात 20 किमी चालणे या प्रकारात खेळाडू पात्र ठरले आहेत.
विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी पात्रता निकष पूर्ण करत ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. यात दोन सांघिक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू पदकासाठी लढत देतील.
तिरंदाजी (रिकर्व्ह) पुरुष सांघिक गटात तरुणदीप राय, अंतनू दास आणि प्रविण जाधव यांनी पात्रता मिळवली आहे. तर, रिले मिश्र शर्यतीत मोहम्मद अनस, व्ही. के. विस्मय, जिश्ना मॅथ्यू आणि टॉम निर्मल नोह यांना टोकियोचे तिकीट मिळाले. तर, पुरुष गटात 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत इरफान थोडी यांनी पात्रता मिळवली आहे.
नेमबाजीत भारताला पदकाची अधिक अपेक्षा असणार आहे. दिव्यांश सिंह पनवर (10 मीटर एअर रायफल), संजीव राजपूत (50 मी रायफल थ्री पोझिशन), सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा (10 मी एअर पिस्तोल) हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. महिला नेमबाजीत अंजुम मौडगिल, अपूर्वी चंडेला (10 मी एअर रायफल), मनू भाकर, यशस्विनी सिंग देशवाल (10 मी एअर पिस्तोल), राही सरनोबत (25 मी पिस्तोल) यांच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.
कुस्तीमध्येदेखील पदकाची अपेक्षा आहे. रवी कुमार (57 किलो गट), बजरंग पुनिया (65 किलो गट), दिपक पुनिया (86 किलो) आणि महिला गटात विनेश फोगट (53 किलो गट) यांनी पात्रता मिळवली आहे.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी आणखी काही स्पर्धा शिल्लक असून त्यातील यशावर भारतीय खेळाडूंची संख्या अवलंबून असणार आहे. टोकियो ऑलिम्पिक 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 दरम्यान पार पडणार आहे.