पुणे: नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटची रंगत परतणार असल्याचे संकेत नुकत्याच मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील निकालानंतर मिळाले आहेत. संघटनेतील पडद्यामागच्या काही गोष्टींमुळे क्रिकेटच्या नकाशावरून हे मैदान गायब झाले होते.
4 मार्च 2008 साली हे स्टेडियम सर्व स्तरांवरच्या क्रिकेटसाठी सज्ज झाले होते. मुळात क्रिकेट आणि फुटबॉल समोर ठेवत या मैदानाची आखणी केली गेली होती. नवी मुंबईतील नेरुळमध्ये असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या भल्या मोठ्या आवारात हे मैदान उभे राहिले आणि हेच मैदान मुंबई इंडियन्स संघासाठी होम ग्राऊंड म्हणून गणले गेले होते. इथे मुंबई इंडियन्सचे आयपीएलचे तीन सामने खेळविले गेले आहेत. त्याचबरोबर 2008 आणि 2010 च्या आयपीएल
स्पर्धेची अंतिम फेरी थाटामाटात पार पडली. त्यानंतर मात्र या मैदानाचे नाव सर्व स्तरांवरील क्रिकेटच्या नकाशावरून अचानक गायब झाले. याला निश्चित कारण कोणते हे जरी स्पष्टपणे कोणी सांगत नसले तरी त्या मागे संघटनेतील अंतर्गत राजकारण, रुसवे फुगवे कारणीभूत होते हे उघड आहे. इंडियन सुपर लीग
फुटबॉल स्पर्धेतील मुंबई सीटी एफसी संघाचे हे होम ग्राऊंड बनले. याच मैदानावर 17 वर्षांखालील गटाची विश्वकरंडक स्पर्धा याच मैदानावर पार पडली होती. त्याचबरोबर महिला गटाच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे सामने देखील इथेच खेळविले गेले होते.
या मैदानाची प्रेक्षक क्षमता जवळपास पन्नास हजार असुन देशातील अत्यंत अत्याधुनिक व सर्व सोई सुविधांनी युक्त असे हे स्टेडियम क्रीडा रसिकांसाठीही आवडीचे बनले होते. या स्टेडियमच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाची नऊ टेनिस कोर्ट असून क्रिकेटचे नर्सरी ग्राऊंडदेखील आहे. या व्यतिरिक्त चार अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट, ऑलिंपिक दर्जाचे जलतरण तलाव देखील आहे. दक्षिण आफ्रिकेतून सुमारे 200 टन माती आणून येथील खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना इथे खेळविला जाणार होता, मात्र संततधार पावसाने हा सामना होऊ शकला नाही. या मैदानाच्या उभारणीसाठी जवळपास तीस कोटी रुपये खर्च आला होता.
रुम बदली करणे, दोन अतिरिक्त ड्रेसिंगरुमची उभारणी, तसेच सरावाची चार नर्सरी ग्राऊंड यासाठी परदेशातील मैदाने फिकी पडतील अशी या मैदानाची सज्जता करण्यात आली आहे. तसेच 500 केडब्ल्यू क्षमतेची सोलर पॅनल बसविण्यात आल्याने आवश्य असणाऱ्या विजेच्या सत्तर टक्के वाटा या पॅनेलमुळे उपलब्ध होतो. आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे प्रमुख विजय पाटील यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या मैदानावर सर्व प्रकारचे क्रिकेट परतणार असे संकेत मिळाले आहेत. सध्यातरी केवळ मुंबई क्रिकेटच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगत पाटील यांनी याबाबतचा प्रश्न टोलविला असला तरी क्रिकेटच्या नकाशावर हे मैदान पुनरागमन करणार हे निश्चित झाले आहे.