जी-20 शिक्षण कार्य गटाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन
पुणे : शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, सभ्यतेचा पायाच उभा नाही, तर आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पुण्यात सुरू असलेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला आज पंतप्रधानांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.
शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय शास्त्रानुसार, शिक्षणाची भूमिका जीवनात आनंदाची दारे करणारी गुरुकिल्ली अशी केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपले मूल्य ठरते, आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.
भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षर ओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या “अर्थ समजून वाचन करणे तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा “निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनीदेखील “पायाभूत साक्षरता आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या विषयावर कालबद्धरीत्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
ई-लर्निंगच्या पद्धतींचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह
दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे. या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव लर्निंग फॉर यंग ऍसपायरिंग माइंडस किंवा स्वयं या ऑनलाइन शिक्षण मंचाचा त्यांनी उल्लेख केला. या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.
आपल्या युवकांना सतत कौशल्य अद्ययावत बनवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. डिजिटल तंत्रज्ञान तोल सांभाळण्याचे काम करते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. शिक्षणात प्रवेश वाढवणे आणि भविष्यातील गरजांशी जुळवून घेणे यासाठी हे एक शक्तीवर्धक आहे. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी त्यांनी जी-20 च्या भूमिकेवर भर दिला.