– हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ।।4।। तैसी जाणीव जेथ न रिघे। विचार मागुता पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या।।5।। अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ।।6।। (अध्याय 7 वा)
संत ज्ञानेश्वर माऊली या सातव्या अध्यायातील ओव्यांच्या माध्यमातून सर्व जगताला ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान यासंबंधी मोलाचे मार्गदर्शनपर भाष्य करतात.
माऊली म्हणतात, विज्ञानाचे स्वरूप समजल्यानंतर स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. ज्याप्रमाणे तीराला टेकलेली नाव हालत नाही त्याप्रमाणे स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर जाणीवच नष्ट होते. जेथे जाणीव उरत नाही, बुद्धीचा प्रवेश होत नाही आणि इच्छित साध्य प्राप्त झाल्यामुळे विचारही आल्या पावली मागे फिरतात आणि तर्क ज्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचत नाहीत त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात.
तसेच जो प्रकृतीपासून पृथ्वीपर्यंत कार्यकरणात्मक प्रपंच आहे त्याला विज्ञान म्हणतात आणि हा प्रपंच खरा आहे, असे समजणे याला “अज्ञान’ म्हणतात; हेही ज्ञान-विज्ञानाबरोबर जाणणे आवश्यक आहे.