हरित क्रांतीशिवाय पर्याय नाही
पुणे, ता. 16 – वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी हरित क्रांतीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे उद्गार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू रॅंग्लर ग. स. महाजनी यांनी काढले. भूजल अन्वेषण व विहिरी खोदण्याच्या विधीतंत्रांची माहिती देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करताना मे बोलत होते.
हे सत्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण व विकासयंत्रणेमार्फत आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रात फक्त साडेआठ टक्के कृषिक्षेत्र ओलिताखाली आहे. हे प्रमाण वाढले पाहिजे त्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व जलसाठ्यांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. पुरामुळे वाहून जाणारे पाणी अडवून ते जरूर त्या भागाकडे वळविण्याच्या दृष्टीने देशात एक वॉटरग्रीड स्थापन करणे हा त्यावर एक उपाय आहे.
महिला चळवळ अधिक स्वातंत्र्य व सर्वंकष विकासासाठी राबवावी
नवी दिल्ली – महिला चळवळ ही पुरुषांच्या विरोधी किंवा त्यांच्याशी स्पर्धा करणारी असता उपयोगी नाही, तर ती चळवळ व्यक्तीप्रमाणेच एकंदर मानवता यांच्या अधिक स्वातंत्र्यासाठी व सर्वंकष विकासासाठी झटणारी चळवळ झाली पाहिजे. अशा आशयाचा संदेश पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीनगर येथे आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय महिला परिषदेला पाठविला आहे.
ही परिषद काश्मीरमधील महिलांसाठी एखादा कार्यक्रम हाती घेईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, खेड्यातील काही स्त्रिया कुठल्याही शाळेत गेलेल्या नसल्या तरी अधिक शहाण्या असतात. त्याचे व्यवहारज्ञान फार मोलाचे असते.