महाभारत आणि रामायण यांवरील संशोधनपर लेखन तसेच शृंगाररसपूर्ण लेखन करणारे आनंद साधले यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म सावंतवाडी जिल्ह्यातील साळगाव येथे 5 जुलै 1920 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सावंतवाडी व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे पार पडले.
मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. पोस्टखात्यात 35 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून त्यांनी मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. लेखनाकडे वेळ देता यावा म्हणून नोकरीत कायम रात्रपाळी घेतली होती. नंदिनी साधले हे त्यांच्या प्रथम पत्नीचे नाव. आयुष्याच्या उत्तरार्धात प्रथम पत्नीशी घटस्फोट घेऊन त्यांनी हैदराबाद येथील संस्कृत प्राध्यापक नलिनी पराडकर यांच्याशी विवाह केला.
“लढाई संपल्यावर’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये सुमारे 60 पुस्तकांचा समावेश आहे. संस्कृतमधील कथा साहित्याचा अभ्यासपूर्ण ललित शैलीत परिचय करून देणारे लेखक म्हणून साधले यांना ओळखले जाते. साधले यांनी मुख्यत्वे संशोधनपर निबंध, ललित साहित्य, कथा साहित्य, अनुवाद आणि भाषांतर असे अनेक प्रकारात लेखन केले. त्यांच्या संशोधनात्मक लेखनात महाभारत आणि रामायण यांवरील साहित्य उद्बोधक आहे. महाभारत या ग्रंथाला अनुसरून अनेक लेखकांनी लेखन केले; पण साधले यांच्या “हा जय नावाचा इतिहास आहे’ या कादंबरीत त्यांनी युधिष्ठिराला खलनायक बनवल्यामुळे मोठी खळबळ माजली व त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. त्याकाळी कादंबरी बरेचदा मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केली जात असे, पण त्यांच्या या कादंबरीला प्रकाशक मिळेना. या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले. अखेर “दीपावली’ने त्यांच्या मासिक अंकांत ती प्रसिद्ध करायला सुरुवात केली. अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, पण सामान्य वाचकांच्या पसंतीस उतरली व अक्षरश: या कादंबरीला डोक्यावर घेतले. त्यानंतर विरोधक हळूहळू थंड पडले.
शाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, मालती माधव, वेणीसंहार,मृच्छकटिक, मुद्राराक्षस अशा प्रसिद्ध संस्कृत नाटकांचे अनुवाद त्यांनी कादंबरीरूपात करून या कादंबऱ्याना शकुंतला, मालविका, उर्वशी, मालती, द्रौपदी, वसंतसेना, चाणक्य अशी नावे त्यांनी दिली. तसेच कुट्टनीमतम्, अमरुशतक, गीतगोविंद ही काव्ये त्यांनी गद्यात अनुवादित केली. पूर्वी प्रेमप्रसंग किंवा शृंगाररसपूर्ण लेखन फारसे होत नसे. मुंबई येथे त्यांना कुरुंदकरांचा सहवास लाभला. त्यांना नरहर कुरुंदकर यांनी अशा प्रकारच्या लेखनासाठी प्रोत्साहन दिले. प्रौढ वाचक असे साहित्य वाचण्यास पात्र असल्याने अशा कथा त्यांनी लिहाव्यात व त्यासाठी कुरुंदकरांनी “चावटपणा’ या साहित्य प्रकारचे विश्लेषण करणारा साहित्यशास्त्रीय प्रबंध त्या ग्रंथाला प्रस्तावना म्हणून जोडावा, असे ठरले. त्यानंतर “आनंदध्वजाच्या कथा’ हा मराठी चावटिकांचा संग्रह त्यांच्या लेखणीतून उतरला. इंग्रजीप्रमाणे मराठीतही हा प्रकार आला. हे लेखन चावट असावे; पण अश्लील वाटता कामा नये अशा पद्धतीने असावे.
शृंगार हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने तो उत्कंटतेने लिहिण्याचे कसब त्यांच्याकडे होते. आनंदध्वजाच्या कथा या संग्रहात प्रामुख्याने विविध देशांतील संस्कृतीतील कथांवर आधारित कथा आहेत. यातली एक कथा वेताळ पंचविशीतील कथांवर आधारित आहे. या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी त्यांनी संस्कृतप्रचुर भाषेचा वापर केला. साहित्यिकप्रेमी यशवंतराव चव्हाण यांनी आनंद साधले यांचे “मातीच्या चुली’ हे आत्मचरित्र वाचले होते तसेच इतर साहित्याचेही वाचन केले होते, असा त्यांच्या “कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात उल्लेख आहे. 4 एप्रिल 1996 रोजी आनंद साधले यांचे निधन झाले.