भारतातील प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व संशोधक सर यदुनाथ (जदुनाथ) सरकार यांचा आज जन्म दिवस. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1870 रोजी सध्याच्या बांगलादेशातील राजशाही जिल्ह्यातील करचमारिया या गावी जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील पुरोगामी होते तसेच ते ब्राह्मो समाजाच्या राजशाही शाखेचे विश्वस्त होते. त्यांना इंग्रजी वाङ्मय व इतिहासविषयक ग्रंथांची खूप आवड होती. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा ग्रंथ संग्रह होता. साहजिक यदुनाथांवर याचे संस्कार बालपणापासून झाले होते. त्यांचे शिक्षण अनुक्रमे जन्मगावी आणि राजशाही व कलकत्ता (कोलकाता) येथे झाले.
वर्ष 1892 मध्ये ते इंग्रजी विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठातून एमए पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर वर्ष 1893 मध्ये कदंबिनी देवी या दहा वर्षांच्या मुलीशी ते विवाहबद्ध झाले. कलकत्त्यातील रिपन कॉलेजात ते प्राध्यापक झाले. विद्यार्थीदशेत त्यांनी अनेक नामांकित लेखकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांच्यावर ईश्वरचंद्र विद्यासागर, चंडिचरण बंडोपाध्याय, देवेंद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव होता.इंग्रजी, बंगाली, संस्कृत व पारशी या भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. त्यांना फ्रेंच व जर्मन, पोर्तुगीज, हिंदी व मराठी याही भाषांची ओळख होती.
1896-98 या कालावधीमधे ते मेट्रो-पोलिटन (विद्यमान विद्यासागर) महाविद्यालयात प्राध्यापक होते. दरम्यान वर्ष 1897 मधे त्यांना प्रेमचंद रॉयचंद ही प्रतिष्ठेची कलकत्ता विद्यापीठाने शिष्यवृत्ती दिली होती. त्या काळात वर्षाला 5 हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षे मिळणारी ती “श्रीमंत’ स्कॉलरशिप होती. यदुनाथांनी इंडिया ऑफ औरंगजेब : स्टॅटिस्टिकस, टोपोगाफी अँड रोड्स हा संशोधनात्मक प्रबंध लिहिला. नंतर कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेज, पाटणा, बनारस, कटक व पुन्हा पाटणा येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्र या विषयांचे अध्यापन केले.
वर्ष 1926 मध्ये ते पाटणा महाविद्यालयातून इतिहास प्रमुख म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी उर्वरित आयुष्य वाचन-इतिहासलेखन व संशोधन यात व्यतीत केले. यदुनाथांच्या शिवचरित्रामुळे मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजीराजे जगभरात कीर्तिमान झाले. 1926 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीने या ग्रंथासाठी त्यांना सर जेम्स कॅम्बेल सुवर्णपदक बहाल केलं.
विल्यम आयर्विनचे अर्धवट राहिलेले काम आयर्विनच्या मुलीच्या आग्रहाखातर यदुनाथांनी पूर्ण केले व त्यांची ओळख जगाला झाली. त्यांच्या या कामगिरीमुळे “केम्ब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाची चार प्रकरणे लिहिण्याचा मान त्यांना मिळाला. यदुनाथ लिहितात, “माझ्या पुस्तकातील एखादे विधान जर नंतर सापडलेल्या पुराव्याच्या आधारे खोडून काढले तर त्याबद्दल मला वाईट वाटेल इतका गर्विष्ठ मी नाही.’ 19 मे 1958 रोजी कलकत्त्यात त्यांचे निधन झाले.