आमदारांनो, पदयात्रा काढा
नागपूर, दि. 9 – पंतप्रधानांचा आर्थिक कार्यक्रम जनतेला समजून सांगण्यासाठी विधानसभेचे चालू अधिवेशन संपल्यावर आमदारांनी आपापल्या मतदारसंघात “पदयात्रा’ काढाव्यात, असे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सांगितले.
विधानसभा कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. सदर आर्थिक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून आमदारांनी जिल्हा पातळीवरच प्रश्नांची सोडवणूक करावी. या आर्थिक कार्यक्रमास वेळेची मर्यादा घातली गेली असून जूनपूर्वी राज्यात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून आमदारांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे, असे शंकरराव चव्हाण म्हणाले.
गांधीजींनी धर्मकारणाचा भाग म्हणून राजकारण केले
कोल्हापूर – महात्मा गांधीजींनी सर्व कार्याला ईश्वरनिष्ठेचा पाया दिला आणि त्याच भूमिकेतून धर्मकारणाचा एक भाग म्हणून राजकारण केले. परंपरेची चौकट मोडण्यापेक्षा ती वाकवून दाखविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते.
जेरुसलेम मिळविण्यासाठी “पवित्र युद्ध’ पुकारावे
अम्मान – जेरुसलेम परत मिळविण्यासाठी “पवित्र युद्ध’ पुकारावे, असे आवाहन सौदी अरेबियाचे राजे खालेद यांनी जगताला केले असल्याचे सोदी रेडिओने जाहीर केले. खालेद यांनी पॅलेस्टाइच्या जनतेला सौदी अरेबिया मदत करील, असे आश्वासन दिले.