-अरुण गोखले
संक्रांतीचा सण येऊन गेला आणि गोड बोला हा संदेश देऊन गेला. हा संदेश मानवी जीवनात फार महत्त्वाचा आहे. कारण शब्द हे एक शस्त्र आहे. ते फार जपून वापरावे लागते. शस्त्रांचे आघात, देहावर होतात, त्यातून रक्त येते. पण शब्दांचे आघात हे मनावर होतात आणि दुखावलेले मन अश्रू ढाळते.
माणसांनी एकमेकांशी कसे बोलावे हे सांगताना कबीरदास असा संदेश देतात की-
“ऐसी बानी बोलिये, मनका आपा खोय । औरन को शीतल करे, आपही शीतल होय ।।’ कबीर इथं हळूूवारपणाने हेच सांगतात की तुम्ही उच्चारलेले मधुर शब्द हे तुमच्या मनाच्या अवस्थेचे दर्शन आहे. तुमच्या हृदयाची पवित्रता आणि तुमच्यातली विनम्रता दाखवीत असतात. म्हणूनच नेहमी असे बोलावे की ज्याने तुम्ही दुसऱ्यांची मने जिंकाल. तुमच्या मधुर बोलण्याने इतरांच्या मनाला आनंद होईल. तुमच्या शब्दांनी एखाद्या दु:खीकष्टी जीवाच्या गालावरून ओघळणारी आसवे पुसली जातीत. भिऊ नकोस मी आहे ना तुझ्या मागे… ह्या शब्दांनी एखाद्या निराधाराला आधार वाटेल. घाबरू नकोस हो पुढे मी आहे मागे… ह्या शब्दांनी दुसऱ्याला नवी उमेद मिळेल, असे बोला. लक्षात ठेवा की ज्या शब्दांनी ऐकणारा आणि बोलणारा अशा दोघांनाही आनंद मिळतो, समाधान मिळते, तोच खरा सुसंवाद.
जीवनातला हा सुखसंवाद साधण्याचा मोलाचा सल्ला देताना पू. गोंदवलेकर महाराजसुद्धा असेच सांगतात की, “गोड सदा बोलावे । नम्रपणे सर्वलोक प्रिय व्हावे.’
म्हणजे काय, तर बाबांनो, बोलताना तुमची भाषा मधुर आणि मवाळ ठेवा. त्यात कोठेही “मी’पणा, अहंकार, गर्व नको. दांभिक बोलू नका. स्वार्थ, अभिलाषा, मोह बाळगू नका. तुमच्या प्रत्येक शब्दात गोडवा राखा, मनात प्रत्येकाबद्दल प्रेमभाव ठेवा. कोणाचेही मन कधीही दुखवू नका.
महाराज तर पुढे जाऊन असेही सांगतात की, दुसऱ्याचे मन दुखावणे ही एक प्रकारची हिंसा आहे. अशी हिंसा तुम्ही करू नका. दुसऱ्याचं मन न दुखावणे हे वाचेचे तप आहे. तुम्हाला जर जग जिंकायचं असेल तर हे वाचेचं तप करा.
संतांच्या या महत्त्वपूर्ण अशा सांगाव्याची आपल्याला नेहमी आठवण राहावी, म्हणूनच कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात गोड बोला ह्या संदेशाची आपल्याला आठवण करून देणारा सण असतो संक्रांतीचा. गोड बोला हा संदेश केवळ संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलावे अशा अर्थाने अनेक लोक या दिवशी गोड बोलताना आणि इतर दिवशी पुन्हा त्यांना या गोड बोलण्याचा विसर पडतो. मात्र गोड बोला हा संदेश आयुष्यभर जपायचा आहे.