ब्रिस्बेन –यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा व चौथा कसोटी सामना आजपासून येथे सुरु होत आहे. जवळपास दहा खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त झालेल्या जखमी भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून दोन वर्षांपूर्वीच्या मालिका विजयाची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे.
ऍडलेडला झालेल्या पहिल्या कसोटीत दारूण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने मेलबर्नवर झालेली दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी केली. तिसरा सामना देखील भारतीय संघाने दुखापतग्रस्त खेळाडूंनी केलेल्या जिद्दी व संयमी फलंदाजीच्या जोरावर अनिर्णित राखला. आता ही मालिका 1-1 अशी स्थितीत आली असून हा सामना मालिकेतील निर्णायक विजेता ठरवणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासले आहे.
भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, इशांत शर्मा, मयंक आग्रवाल, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन व आता जसप्रीत बुमराह देखील दुखापतीने त्रस्त झाल्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला अननुभवी खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व आले. कोहलीच्या नेतृत्वाखालील ऍडलेडची पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न कसोटी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर सिडनी कसोटीत जिद्दी खेळी करत सामना अनिर्णित राखला असून आता आजपासून सुरु होत असलेला चौथा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.
भारताची फलंदाजी सलामीवीर शुभमन गिल, हिटमॅन रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, कर्णधार रहाणे, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांच्यावर अवलंबून आहे. त्यातच अपयशी ठरत असल्यानंतरही पृथ्वी शॉ याला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. आता ऋषभ पंत तंदुरुस्त ठरला तर साहाच्या जागी तोच अंतिम संघात खेळेल. भारतीय गोलंदाजीची मदार नवोदित महंमद सिराज, नवदीप सैनी व टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर राहील.
अंतिम 11 खेळाडूंमध्ये ठाकूर व नटराजन यांच्यातील एकाला संधी मिळण्याची शक्यता असली तरीही गोलंदाजीतील विविधतेच्या जोरावर व भन्नाट यॉर्कर टाकण्याची क्षमता सिद्ध केल्यामुळे नटराजनला संधी मिळण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे. जडेजा जायबंदी असल्याने फिरकी गोलंदाजीचा भार मुख्यत्वे अश्विनलाच वाहावा लागणार आहे. मात्र, तो जर या सामन्यात खेळू शकला नाही तर डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. 2018 साली भारतीय संघाने कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 असे पराभूत करत एतिहासीक मालिका विजय मिळवला होता. यंदाही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाले तर विल्यम्स पुकोव्हस्की दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्याने संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार टीम पेनी, स्टिव्ह स्मिथ, कॅमेरुन ग्रीन, मॅथ्यू वेड, ट्रेव्हस हेड व मार्नस लेबूशेन यांच्यावरच राहणार आहे. याच बलाढ्य फलंदाजीला रोखण्याचे आव्हान भारताच्या अननुभवी गोलंदाजांसमोर राहणार आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड यांच्या वेगवान गोलंदाजीवर मोठी धावसंख्या उभारण्यात भारतीय संघाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
नाथन लियॉन हा एकमेव फिरकी गोलंदाज असला तरीही त्याने या कसोटी मालिकेत सातत्याने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखले आहे. त्यातही भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारावरही त्याने सातत्याने मात केली आहे. त्यामुळे या चारही गोलंदाजांनी सरस कामगिरीत याही सामन्ययात सातत्य राखले तर भारताच्या फलंदाजांसमोर आणखी कठीण आव्हान निर्माण होणार आहे. यजमान संघालाही काही खेळाडूंच्या दुखापतीने सतावले आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल्यम्स पुकोव्हस्की हे दुखापतीतून पूर्ण सावरले नसल्याने त्यांच्या संघातही एक किंवा दोन बदल होण्याची शक्यता आहे.
वर्णद्वेषी टीका करणाऱ्यांना चाप
सिडनी कसोटीत काही प्रेक्षकांनी जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांना उद्देशून वर्णद्वेषी टीका केली होती. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण खराब झाले होते. त्यानंतर या सगळ्या गोष्टी मागे टाकून भारतीय संघाने सरस कामगिरी केली. या चौथ्या कसोटीत जर अशी घटना घडली तर मात्र, अत्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे.
अष्टपैलूची उणीव भारताला जाणवणार
रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे आता चौथ्या कसोटीत भारतीय संघाला एका अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवणार आहे. तसे पाहायला गेले तर वॉशिंग्टन सुंदर एक गोलंदाज असला तरी तो उपयुक्त फलंदाजही आहे, त्यामुळे या सामन्यासाठी त्याला संधी देण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. मात्र, जर चार वेगवान गोलंदाज खेळवण्याबाबत एकमत झाले तर कुलदीप यादवच्या जागी सुंदरचे संघातील स्थान निश्चित होईल. येथील खेळपट्टीचा इतिहास पाहता फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांनीच जास्त वर्चस्व राखले असल्याने महंमद सिराजसह नवदीप सैनी, टी. नटराजन व शार्दुल ठाकूर यांना स्थान देत भारतीय संघ 5 फलंदाज, 5 गोलंदाज व एक यष्टीरक्षक फलंदाज असा संघ खेळवला जाईल.