कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात सुमारे चार हजार किलोमीटर अंतर पार करून “भारत जोडो’ यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे कॉंग्रेस पक्षासाठी देशात निश्चितच चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. या “भारत जोडो’ यात्रेनंतर कॉंग्रेस पक्षाने पक्षाचा कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये “हात से हात जोडो’ या कार्यक्रमाचीही सुरुवात केली आहे.
अर्थात, या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये जागृती करण्याचे काम होणार असले, तरी कॉंग्रेस पक्षाचा हात सोडून इतरत्र जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष काय करणार आहे, हासुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. ज्या प्रकारे विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसच्या एकूण कारभाराबाबत गौप्यस्फोट केले ते पाहता पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या नेत्यांना पक्षात योग्य आणि सन्मानाची वागणूक दिली जाते की नाही, याबाबत शंका येते. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गेल्या महिन्यात उमेदवारीवरून जो गोंधळ निर्माण झाला होता त्याबाबतचे स्पष्टीकरण करताना सत्यजित तांबे यांनी आपल्याला आणि आपल्या घराण्याला जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचे थेट आरोप केले आहेत.
सत्यजीत तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे दीर्घकाळ कॉंग्रेस पक्षाशी निगडित आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेसुद्धा तांबे घराण्याचे जवळचे नातेवाईक आहेत. या निवडणुकीच्या उमेदवारीच्या विषयावरून थोरात आणि तांबे या घराण्यांना त्रास देऊन त्यांना राजकीयदृष्ट्या बाजूला सारण्याचा कट रचण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणूनच मला निवडणूक लढवायची होती; पण एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ज्या फॉर्मची गरज असते त्या एबी फॉर्मचे वितरण करताना कॉंग्रेस पक्ष संघटनेतर्फे गोंधळ झाल्याने मला अपक्ष असा अर्ज भरावा लागला, असा खुलासा सत्यजित तांबे यांनी केला आहे.
तांबे आणि थोरात या घराण्यांना त्रास देण्यासाठी ही एक स्क्रिप्ट रचण्यात आली होती. त्या स्क्रिप्टप्रमाणे सर्वांनी काम केले, असा स्पष्ट आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. त्यावर कॉंग्रेस प्रवक्तांनी खुलासा करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी कॉंग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या असलेल्या तांबे आणि थोरात या घराण्यांची नाराजी मात्र पक्षाने निश्चितच ओढवून घेतली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्यजित तांबे यांचा रोख कॉंग्रेस पक्षापेक्षाही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दिशेनेच जास्त आहे. पटोले यांची एकूण कारकीर्द काही प्रमाणात वादग्रस्त ठरू पहात आहे. मधल्या काही कालावधीमध्ये भाजपमध्ये जाऊन तेथे चांगली पदे उपभोगल्यानंतर पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये आल्यावर नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासारखे महत्त्वाचे पद दिल्यामुळे कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे.
निष्ठावंतांना डावलून भाजपमध्ये जाऊन पुन्हा कॉंग्रेसमध्ये आलेल्या नेत्याला जेव्हा प्रदेशाध्यक्षपदावर बसवले जाते तेव्हा निश्चितच नाराजी समजण्यासारखी असते. नाना पटोले यांची एकूण कार्यपद्धतीसुद्धा निष्ठावंत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पटणारी नाही. निवडणुकीच्या उमेदवारीवरून जेव्हा गोंधळ सुरू होता तेव्हा सत्यजित तांबे हे भाजपाच्या मार्गावर असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात येत होत्या. तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्यानेच कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा न देण्याचा किंवा आपला उमेदवार न मानण्याचा निर्णय घेतला, असेही अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आले होते. पण आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर सत्यजित तांबे यांनी स्पष्टपणे मी अपक्ष राहणार असल्याचे सांगितले आहे.
जर कॉंग्रेसने विधानपरिषद निवडणुकीमध्ये एबी फॉर्मच्या वाटपामध्ये घोळ केला नसता, तर सत्यजित तांबे कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असते, असे आता तरी एकूण खुलासावरून स्पष्ट होते. पण सत्यजित तांबे आणि भाजप यांच्यामधील जवळीक वाढली असल्याच्या बातम्यांवरून आणि एकंदरीत अंदाजावरून कॉंग्रेस पक्षाने तांबे घराण्याला बाजूला सारण्याचा निर्णय घेतला असावा. गेल्यावर्षी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे एका व्यासपीठावर असताना फडणवीस यांनी आमचा सत्यजित तांबेंवर डोळा असल्याचे विधान केले होते. केवळ त्या विधानाचा आधार घेऊन जर नाना पटोले आणि त्यांच्या विचारसरणीचे काही कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्यासारख्या युवा नेत्याला बाजूला करत असतील, तर ते अपरिपक्व राजकारणाचे उदाहरण मानावे लागेल. तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर विदर्भातील कॉंग्रेसचे आणखी एक नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट नाही; पण अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, हीसुद्धा गोष्ट लक्षणीय आहे.
तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेसबाबत जी एक अविश्वासाची आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे ती बाजूला करण्यासाठी निश्चितच कॉंग्रेस पक्षातर्फे प्रयत्न केले जातील. सध्याच्या कालावधीमध्ये देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवरसुद्धा कॉंग्रेसमधील तरुण पिढीला या ना त्या कारणाने इतर राजकीय पक्षांचा आसरा घ्यावा लागत आहे, हे वास्तव कॉंग्रेस पक्षाला नाकारून चालणार नाही. एकीकडे स्थानिक पातळीवर “हात से हात जोडो’ यासारखे आंदोलन करून चांगल्या वातावरणाची निर्मिती होत असताना जर कॉंग्रेसचा हात सोडून युवा येते इतरत्र जात असतील, तर ती गोष्ट आता गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे. नेत्यांनी आमचा पक्ष सोडला म्हणून कॉंग्रेस पक्षावर कोणताही फरक पडत नाही, अशा प्रकारची भूमिका घेण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. याची जाणीव नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. ज्या युवा नेत्यांवर कॉंग्रेसचे आगामी राजकारण अवलंबून आहे ते युवा नेते तरी कॉंग्रेसचा हात सोडणार नाहीत, याची खबरदारी आगामी कालावधीमध्ये कॉंग्रेस पक्षाला घ्यावीच लागेल. सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने एक उदाहरण समोर आले आहे, त्याची पुनरावृत्ती इतरत्र होणार नाही याची काळजी आता कॉंग्रेसला घ्यावीच लागेल.