-विठ्ठल वळसे पाटील
“वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाला किती अनन्य साधारण महत्त्व आहे हे लक्षात येते. वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी, जोपासण्यासाठी, युवा पिढीमध्ये वाचनाचे बीज रुजले जावे यासाठी माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा होतो.
वाचनाचा प्रचार, प्रसार होण्यासाठी शाळा, कॉलेजातून विविध उपक्रम राबविले जातात. करोना आणि लॉकडाऊन असले तरी आपण मित्र, कुटुंबातील सदस्य, कामगार वर्ग यांना पुस्तके भेट देणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश देऊन वाचन, संमेलन, व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामूहिक वाचन, विविध स्पर्धा आदी उपक्रम राबवून वाचन संस्कृती लोकांत रुजवली पाहिजे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मोठे प्रयत्न केले. ते वैज्ञानिक असताना त्यांनी 1996 मध्ये “इंडिया 2020′ हे पुस्तक लिहिले. त्यावर नियोजन मंडळाने कार्य केले. त्यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असून शिक्षक व मुलांमध्ये रमणे हा त्यांचा छंद नव्हे, तर उद्याचे नवं भारताचे स्वप्न शिक्षक आणि विद्यार्थी घडवतील हीच त्यांची धारणा होती. सारे आयुष्य साधेपणाने जगले. त्यांचे वैज्ञानिक व राष्ट्रपती म्हणून कार्य पहिले तर उत्तुंग शिखरासारखे आहे. अलौकीक कार्यामुळे त्यांना “भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान लाभला. त्यांनी एकूण 24 प्रेरणादायी पुस्तके लिहिली असून, त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी म्हणूनच वाचन दिन महत्त्वाचा आहे. वाचन दिन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी झाला पाहिजे.
संत तुकाराम महाराजांनीसुद्धा शब्दांचे महत्त्व विशद केले आहे.
जनलोका सांगताना-
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।।
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन
शब्दे वाटु धन जन लोका।।
म्हणजे शब्द हेच रत्न आणि शस्त्र आहेत असे संत तुकाराम म्हणतात.
ग्रंथ आणि पुस्तके खरे गुरू आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकाराम, संत सावता महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत कबीर यांनी आपल्या संत वाणीतून जनाला संबोधन केले. तर महात्मा जोतिबा फुले यांनी शोषितांसाठी शिक्षणाचे दार उघडले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही वर्ग चंगळवादाकडे वळाला. वाचन आणि राष्ट्राभिमान हा जणू नाहीसा झाला असे वाटत असताना अनेक महान विभूतींनी व साहित्यिकांनी उत्तम साहित्य निर्माण केले. लोकसाहित्य, ग्रामीण, शहरी, ललित, दलित, कामगार साहित्य, नवनवे चित्रपट आणून समाजात प्रबोधनही केलं.
सध्या नव्या पिढीकडे वाचन कमी आणि मनोरंजनाकडे जास्त कल दिसतो आहे. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. अग्रलेख तर वृत्तपत्राचा आत्माच आहे. त्याच्या वाचनाने अनेक व्याख्याते तयार झाले. एक पिढी वाचन करून घडली. वंदे मातरम् आणि इन्कलाब जिंदाबाद हे जयघोष करून स्वातंत्र्याची महती वाढली. यातून क्रांतिकारक जन्माला आले. त्यांचे जीवनकार्य वाचून दुसरी पिढी घडली. स्वातंत्र्यकाळात अनेक वृत्तपत्रांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत तयार केले. वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी महत्त्वाची कामगीरी बजावली. त्यामुळे नव्या पिढीच्या हातात मोबाइल देण्यापेक्षा पुस्तक द्या.
हातातल्या पुस्तकांची जागा मोबाइलने घेतली. सर्व काही त्यात उपलब्ध झाले. सेवेत सोशल मीडिया, दृश स्वरूपातील चित्रणे, गाणी तर आभ्यासाची सूत्रेही आहेत. स्मार्ट झालेला हा फोन त्यात आलेल्या गेम्स व सोशल मीडियाच्या नशेच्या व नैराश्याच्या गर्तेत अडकला. नव्या पिढीचा वर्ग वाचनापासून दूर गेलाच शिवाय खेळाच्या मैदानालाही दुरापास्त झाला. अनेकांनी मोबाइल गेम्समध्ये हरल्यामुळे पराभूत भावनेतून जीवन यात्राच संपवून टाकली. मोबाइलमध्ये फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर, इंस्टाग्राम, यू-ट्यूब, ई-मेल, मेसेंजर आदी वापराने सोशल मीडिया प्रभावशाली झाला.
अनेक सायबर गुन्हे निर्माण झाले. काहींनी याच स्मार्ट फोनचा वापर करून न्याय्य कामे तर काही शैक्षणिक कार्य करीत आहेत. काय वाचावे, काय वाचू नये याचे धडे मात्र पालक आणि शिक्षकांकडून मिळत नसल्याने वाचन संस्काराचा ऱ्हास झाल्याने मुलांचे मानसिक संतूलन बिघडू लागले आहे. वेळीच सावध झाले पाहिजे. जगात नवनवे तंत्रज्ञान अवगत झाले. छपाई तंत्रही बदलले. काही तासांच्या आत ग्रंथ छपाई व बांधणी होऊ लागली. त्याही पलीकडे जाऊन संगणकीय युगात संगणकावर क्लिक करताच माहिती उपलब्ध होतेय. ई-वृत्तपत्र व ई-पुस्तक तर आहेच शिवाय कोणत्याही शब्दाचा अर्थ सापडतो. अनेक पुस्तके श्रवण स्वरूपात मिळतात.
ऐतिहासिक, शौर्य, आत्मकथन, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण यावर विपुल लिखाण झाले आहे. हे सारे साहित्य आयुष्याच्या वाटेवर भेटणारे गुरू आहेत. स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचून अनेकांनी आत्महत्येचा मार्ग सोडला. ग्रंथ आणि पुस्तके ही प्रेरणा देणारी आहेत. जीवन समृद्ध करणारी आहेत. साहित्य पंरपरेचा ठेवा एका पिढीकडून पुढे जात राहिला पाहिजे. इतिहास वाचला तरच इतिहास घडेल. हीच प्रेरणा राष्ट्राच्या एकात्मतेला बाधा येऊ देणार नाही. प्रत्येकात राष्ट्रभावना प्रेरित व्हावी हीच डॉ. कलाम यांची भावना होती. त्यांना मानवंदना म्हणून वाचन दिन हा साजरा व्हावा यातूनच वाचन संस्कृती रुजवली जाईल.