राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विधानसभेत सात-आठ मिनिटं गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं वाचन करत राहिले, हे धक्कादायक आहेच. पण त्याहून अधिक आश्चर्यकारक प्रश्न असा की, आपण जुनंपुराणं वाचत आहोत, हे वाचणाऱ्यालासुद्धा कळलं नाही, मग ऐकणाऱ्यांना कसं कळलं?
सत्ताधारी पक्षाची बात वेगळीच असते. वाचन सुरू असताना कोणकोणत्या मुद्द्यांवर बाकं वाजवायची, हे आधीच ठरलेलं असतं. विरोधकांना दरवर्षी अर्थसंकल्पातल्या चुका काढायच्या असतात. मागच्या वर्षी आपण कोणत्या चुका काढल्या होत्या, हे आठवण्यात एनर्जी खर्च करायची नसते. अर्थात, राजस्थानच्या विधानसभेत जो “इतिहास’ घडला, त्याची चाहूल गेहलोत यांच्याच एका मंत्र्याला सर्वप्रथम लागली, त्यांनी गेहलोत यांना भाषण थांबवायला सांगितलं आणि मग विरोधकांना समजलं, अशीच “क्रोनोलॉजी’ सांगितली जाते.
“इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजने’ची घोषणा गेल्याच वर्षी झालेली असल्यामुळे चूक लक्षात आली. अर्थात, उशिरा कळली तरी चूक ती चूक! तीसुद्धा एवढी महाभयंकर! मग विरोधक इतिहास घडवण्यात मागे राहतील का? अर्थसंकल्पीय भाषण चालू असताना कामकाज तहकूब होण्याचा विक्रम त्यांनीही नोंदवून घेतला. गेहलोत “माफ करा,’ वगैरे म्हणत राहिले; पण विरोधक काही ऐकेनात. अर्थसंकल्प “लीक’ झाल्याचा आरोप करून त्यांनी हंगामा सुरूच ठेवला. जे घडलं ती “मानवी चूक’ होती हे खरं; पण ती कुणाकडून घडली, याची झाडाझडती आता चाललीय.
एवढा मोठा पाणउतारा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना बोलावून घेतलं, तेव्हा लक्षात आलं की, नव्या ब्रीफकेसमध्ये जुन्या अर्थसंकल्पाची काही पानं ठेवली गेली होती. ती ब्रीफकेस ज्या कुठल्या अधिकाऱ्यानं “तयार’ केली असेल, त्याचा चेहरा संपूर्ण देशाला न पाहताच दिसला असेल. एकतर चूक त्रयस्थ व्यक्तीच्या लक्षात आपल्याही आधी आली, म्हणून विरोधक कातावलेले. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीला अर्थसंकल्प आधीच समजला होता, असा आरोप करून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचा उरलासुरला हुरूप घालवला. नंतर उसनं अवसान आणून, आपला “दूरदृष्टीचा’ अर्थसंकल्प विरोधकांना कसा टोचतोय, वगैरे टोमणे मुख्यमंत्र्यांनी हाणले; पण त्यात विशेष जोर नव्हता. खरंतर अर्थसंकल्प एका वर्षासाठी असतो आणि त्यात एका वर्षाचाच विचार असायला हवा.
पण हल्ली केंद्राच्या अर्थसंकल्पातसुद्धा पंधरा-वीस वर्षांनंतरचा विचार असतो तर आपण दोन-पाच वर्षांनंतरचा विचार करायला काय हरकत आहे, अशा भावनेनं गेहलोत यांनी 2028 पर्यंतची “दूरदृष्टी’ कागदावर उतरवली होती; पण वाचला भूतकाळच! वेळ आलीच असेल तर कितीही प्रयत्न केले तरी फजिती टळत नाही, हेच खरं. आता गेहलोत यांच्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर आणि कथित दूरदृष्टीवर किती चर्चा होईल, हे वेगळं सांगायला नको!
चूक कुणाच्याही हातून घडली असली तरी विरोधकांनी जेवढी मनावर घेतली, तेवढी जनता मनावर घेईल असं मात्र समजायचं कारण नाही. फियास्को मोठा झाला हे खरं; पण निवडणुका लागल्यावर पाच वर्षांपूर्वी ऐकलेली भाषणं पुन्हा ऐकायची जनताजनार्दनाला सवय आहे. मुद्देही तेच असतात, आश्वासनंही तीच असतात, आरोप-प्रत्यारोपही तेच असतात आणि लोकांची परिस्थितीही पाच वर्षे तशीच असते. त्यामुळे बजेट ताजं वाचलं किंवा शिळं वाचलं, तरी लोकांच्या आयुष्यात फरक पडत नाही.