सामान्यांचे जीवन सुखी, तरच लोकशाही टिकेल
नवी दिल्ली, दि. 12 – सामान्य माणसाच्या जीवनात अडचणी निर्माण होत नाहीत, याबद्दल प्रत्येक नागरिकाला खात्री वाटली पाहिजे तरच लोकशाही कारभार चालू शकेल, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काढले. आणीबाणी जारी करण्यापूर्वी राष्ट्रातील एकंदर परिस्थिती धोकादायक होती.
राष्ट्राच्या एकतेला धोका निर्माण झाला होता. थोडेसे शैथिल्य येताच एकीकडे अशी भाववाढ दिसते व दुसऱ्या बाजूला काही लोक आणीबाणी उठवावी म्हणून मागणी करीत आहेत, असे पंतप्रधान म्हणाल्या.
पुण्यात निवडणूक वातावरण
पुणे – पुणे शहरात निवडणुकीच्या वातावरणात हळूहळू रंग भरत चालला आहे. कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव थोरात यांच्या प्रचाराचा नारळ अद्याप फुटला नसला तरी कॉंग्रेस पक्षाची सर्व यंत्रणा एकदिलाने व एकजुटीने कामास लागली आहे.
जनता पक्ष यंत्रणेचेही काम जोरदारपणे सुरूच आहे. येत्या 14 तारखेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे हस्ते कॉंग्रेस प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असून त्यादिवशी होणाऱ्या जाहीर सभेत विठ्ठलराव गाडगीळ, शरद पवार यांची भाषणे होतील. मार्चमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी याही पुण्यास येण्याची दाट शक्यता आहे.